पीक विम्याचे ७९ कोटी आले हो...!
By Admin | Updated: June 23, 2015 00:26 IST2015-06-23T00:26:55+5:302015-06-23T00:26:55+5:30
गतवर्षीचा खरीप हंगाम अल्प पावसाने उद्ध्वस्त झाला होता.

पीक विम्याचे ७९ कोटी आले हो...!
सव्वालाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : सात दिवसात होणार खात्यात जमा
यवतमाळ : गतवर्षीचा खरीप हंगाम अल्प पावसाने उद्ध्वस्त झाला होता. या हंगामासाठी पीक विमा काढणाऱ्या सव्वालाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही रक्कम सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप हंगामात एक लाख ३१ हजार ८६४ शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी नऊ कोटी ६७ लाख १२ हजार ५९९ रुपये भरले होते. त्यातून २०० कोटी ७० लाख ९१ हजार ७९३ रुपयांचे पीक संरक्षित करण्यात आले होते. कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. मोठे नुकसान झाले. यामध्ये पीक विमा उतरविणाऱ्या एक लाख ३१ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख २२ हजार ४५७ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांना ७८ कोटी ७९ लाख ४८ हजार १३८ रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम जिल्ह्याकडे वळती करण्यात आली. ही सर्व रक्कम सोमवारी बँकांच्या तालुका शाखांमध्ये जमा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सर्कलनिहाय याद्या तयार करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी आणखी सात दिवस लागणार असून २९ जूनपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता बँक स्तरावर व्यक्त करण्यात आली आहे. विम्याच्या मदतीस पात्र ठरलेले सर्वाधिक शेतकरी उमरखेड तालुक्यातील असून २९ हजार ६७९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर सर्वात कमी शेतकरी मारेगाव तालुक्यातील आहे. (शहर वार्ताहर)