पीक विमा कर्जात वळता
By Admin | Updated: March 26, 2015 02:15 IST2015-03-26T02:15:01+5:302015-03-26T02:15:01+5:30
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना घोषित झालेली पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याचा प्रताप यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला.

पीक विमा कर्जात वळता
रूपेश उत्तरवार यवतमाळ
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना घोषित झालेली पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याचा प्रताप यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला. एक लाख तीन हजार ५५३ शेतकऱ्यांचे ४७ कोटी रुपये परस्परच कापण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यात असंतोष पसरला आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी हवामानावर आधारित पीक विमा काढतात. अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, गारपीट या सारख्या नैसर्गिक आपत्तीतून पिकाच्या संरक्षणाची हमी कंपनीने घेतली आहे. २०१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. यावर्षीच खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला.
शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन घटले. त्यामुळे विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना हवामानावर आधारित पीक विमा मंजूर केला. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकेला ६७ कोटी रुपये विमा मदतीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी वळती करण्यात आली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होती. पीक विमा उतरविणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र एन्डींगच्या तोंडावर ही रक्कम बँकेत आली. याच संधीचा फायदा घेत जिल्हा बँकेने ही रक्कम थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जात वळती केली. जिल्हा बँकेच्या एक लाख २० हजार खातेदारांना पीक विमा मंजूर झाला आहे. त्यापैकी एक लाख तीन हजार शेतकरी थकबाकीदार आहे.
या थकबाकीदार शेतकऱ्यांची विम्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळती करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत बँकेने कायद्याचा आधार घेत बँका तारल्या.
मात्र शेतकरी आणखी संकटात लोटला गेला आहे. आपत्तीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळाली असली तरी मदतीचे आकडे केवळ पास बुकातच पहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या या तुघलकी कारभाराने शेतकरी संतप्त झाले आहे.