दारव्हात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:32+5:30

तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली.

Crisis of double sowing in Darwaza | दारव्हात दुबार पेरणीचे संकट

दारव्हात दुबार पेरणीचे संकट

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : पावसाअभावी पिके करपली, निकृष्ट बियाण्यांचाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात तुरळक वगळता दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके कोमेजण्याची, करपण्याची शक्यता बळावली. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली. यावर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याच्या बातम्या आल्या. जून उजाडल्यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. वातावरण निर्मिती झाल्याने मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पेरणीला सुरुवात करण्यात आली.
तालुक्यात ३१ हजार २५० हेक्टरवर कपाशी, २५ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५०० हेक्टरवर तूर लागवडीचा अंदाज आहे. या प्रमुख पिकासह एकूण ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड करण्यात आली. परंतु आठवडा उलटून गेला तरी पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांनी जमिनीतच दम तोडला. उगवलेल्या कोंबांना पाणी मिळाले, त्यांनी तग धरला. मात्र पाण्याअभावी इतर पिके करपत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.
यावर्षी कोरोनामुळे आधीच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रथम शेतमाल विक्रीची समस्या निर्माण झाली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर अनेकांचा नंबर लागला नाही. चुकारे उशीरा मिळाले. तसेच कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण आली. या सर्व संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी तजवीज करुन पेरणी केली. आता आसमानी संकट उभे राहिले. जून महिना संपत आला तरी एकही सार्वत्रिक व दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.
गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अंकुरलेले बियाणेही करपत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहे.

मदतीची अपेक्षा
पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास कोरडवाहू क्षेत्रातील सर्वच पेरण्या उलटण्याची भीती आहे. त्यामुळे असमानी, सुलतानी संकटांचे वार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Crisis of double sowing in Darwaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती