खून, दरोडा, दंगा, वाटमारीचे गुन्हे घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:13 IST2017-12-30T22:13:33+5:302017-12-30T22:13:45+5:30
संघटित गुन्हेगारीची नेहमी चर्चा होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात खुनाचे गुन्हे तब्बल १८ ने घटले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.

खून, दरोडा, दंगा, वाटमारीचे गुन्हे घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संघटित गुन्हेगारीची नेहमी चर्चा होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात खुनाचे गुन्हे तब्बल १८ ने घटले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
एसपी राज कुमार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी गुन्ह्यांची संख्या ४७२ ने वाढल्याचे दिसत असले तरी खून १८, दरोडा तीन, जबरी चोरी चार, मोटरसायकल चोरी ११, जनावर चोरी दहा, वायर चोरी दहा व दंग्याच्या गुन्ह्यामध्ये १५ घट झाली आहे. गंभीर गुन्ह्यातील घट ही पोलिसांसाठी जमेची बाजू आहे. पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गंभीर गुन्हे नियंत्रणात आणणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. एका गुंडावर मोक्का लावण्यात आला. क्रियाशील २१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून आणखी ५९ गुंडांची प्रकरणे प्रस्तावित आहे. १७ अग्निशस्त्रे व ४५ तलवारी जप्त करण्यात आल्या. अंमली पदार्थाच्या सहा गुन्ह्यात नऊ आरोपी व पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला. जनावरे वाहतुकीच्या २६ प्रकरणात ७५ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला गेला. सात कोटी ८८ लाखांची दारू व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी नोंदविली. घरफोडीचे २५ गुन्हे उघडकीस आणले. वणीतून चोरी गेलेल्या बाळाला तेलंगाणातून सुखरूप परत आणले. सुधीर काळे, शेख सादिक शेख गफ्फार या कुख्यात गुंडांना गजाआड करण्यात आले. टोळीविरोधी पथकाने पाच आव्हानात्मक खून उघडकीस आणले, असे स्पष्ट करताना गेल्या वर्षभरातील एकूणच कामगिरीवर राज कुमार यांनी समाधान व्यक्त केले. पत्रपरिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.