अपघातातील ‘त्या’ तिघांवर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: April 29, 2015 02:27 IST2015-04-29T02:27:33+5:302015-04-29T02:27:33+5:30
कार अपघातात ठार झालेल्या सिंधू संस्कृती संशोधकांसह तिघांवर यवतमाळच्या मोक्षधामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघातातील ‘त्या’ तिघांवर अंत्यसंस्कार
यवतमाळ : कार अपघातात ठार झालेल्या सिंधू संस्कृती संशोधकांसह तिघांवर यवतमाळच्या मोक्षधामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील, मुलगा आणि चुलत भावाची एकाचवेळी पेटत्या तीन चिता पाहून प्रत्येक जण हळहळत होता.
दारव्हा-कारंजा मार्गावरी सागंवी गावाजवळ कारला एका मालवाहू वाहनाने सोमवारी धडक दिली होती. यात आंतरराष्ट्रीय सिंधू संस्कृती संशोधन संस्थेचे सचिव तथा दिग्रस येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक सुभाष शेषराव ईहरे (५५) त्यांचे वडील शेषराव चंद्रभान ईहरे (८०) रा. दिग्रस आणि केशव बापूराव ईहर (६५) रा. उमरसरा यवतमाळ ठार झाले होते. केशव ईहरे यांचे शवविच्छेदन कारंजा येथे तर सुभाष व शेषराव यांचे शवविच्छेदन यवतमाळात करण्यात आले. त्यानंतर सोमवारी येथील उमरसरा परिसरातील केशवराव ईहरे यांच्या घरून तिघांचीही अंत्ययात्रा काढण्यात आली. येथील पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात भडाग्नी देण्यात आला. शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
सुभाष ईहरे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई आहे. तर केशव ईहरे यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी आहे. पिता-पुत्राचा आणि चुलत भावाचा दुर्दैवी मृत्यू सर्वांना चटका लावून गेला. सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)