कापूस, सोयाबीनने माना टाकल्या
By Admin | Updated: July 13, 2015 00:16 IST2015-07-13T00:16:35+5:302015-07-13T00:16:35+5:30
जुलै महिना अर्धा संपत आला तरी उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने शेतात उगवलेले कापूस आणि सोयाबीनचे रोपटे माना टाकत आहे.

कापूस, सोयाबीनने माना टाकल्या
दुबार पेरणीचे संकट : महागावात आतापर्यंत केवळ १५४ मिमी पाऊस
महागाव : जुलै महिना अर्धा संपत आला तरी उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने शेतात उगवलेले कापूस आणि सोयाबीनचे रोपटे माना टाकत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. आतापर्यंत तालुक्यात केवळ १५४ मिमी पावसाची नोंद झाली असून पाण्याची पातळी खोल गेल्याने दुष्काळाचे सावट आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसात महागाव तालुक्यात जवळपास ८० टक्के पेरणी झाली. २४ हजार २१० हेक्टरवर कपाशी तर १३ हजार ७५० हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले. पोषक वातावरण असल्याने पीक बहरले. मात्र त्यानंतर आता जुलै महिना अर्धा संपला तरी तालुक्यात कुठेही पावसाची नोंद नाही. दररोज उन्हाळ्यासारखे कडक उन्ह तापत आहे. गतवर्षीही पाण्याचे प्रमाण अल्प होते. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली होती. यावर्षीही पाण्याचे अल्पप्रमाण असल्याने भूगर्भातील जल पातळी खालावली आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. गावागावातील शेतात भयानक वातावरण दिसत आहे. शेतकरी शेतात जाऊन माना टाकलेल्या पिकाकडे हताश होऊन पाहत आहे. अशा स्थितीत आता दुबार पेरणीचे संकट अटळ दिसत आहे.
अत्यल्प पावसाने गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरपूर येथे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सभापती गोदावरीबाई जाधव, गटविकास अधिकारी शेळके यांनी या गावांना भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील ११० गावांचे प्रतीक शिरपूर मानले जात आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर मुडाणा, घानमुख, शिरमाळ, बिजोरा, वडद, नांदगव्हाण, वरोडी, कासारबेहळ, टेंभी, उटी, सवना, अंबोडा येथे महिलांची पायपीट सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)