कपाशी, सोयाबिनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: September 11, 2014 23:52 IST2014-09-11T23:52:18+5:302014-09-11T23:52:18+5:30
सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी

कपाशी, सोयाबिनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव
वणी : सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी आलेले पिकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकरी देधोधडीला लागण्याची शक्यता बळावली आहे.
विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला ओळखले जाते़ परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून कपाशीवर केलेला खर्चही शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे़ तथापि शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने आणि शेतीशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने नाईलाजाने विदर्भातील शेतकरी जादा प्रमाणात कापूस पिकांची लागवड करीत असतात़ त्यातच कापसाला हमी भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून या जिल्ह्याला शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात आहे़
यंदा खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांचा अंतच पाहिला़ जून-जुलै महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिके उगवलीच नव्हती़ त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुबार, तिबार पेरणी केली़ परंतु पावसाने १५ ते २० दिवस दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे त्यांना कर्जही घ्यावे लागले़ तरीही शेतकऱ्यांनी पिके जगवली़ आता कपाशीला फुलेही लागली. तथापि गेल्या सप्ताहात तालुक्यात संततधार पाऊस प्झाला. त्यामुळे जमिनीतील ओलावा हटत नसल्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे़
यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर कपाशीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सोबतच २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली. तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली.
आता कपाशीवरील लाल्या रोगाचा प्रतिबंध कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे़ बँकाही पुन्हा कर्ज देण्यास नकार देत असल्याने महागडी औषधी घेऊन झाडावर फवारणी कशी करावावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)