कापूस, सोयाबीनच्या पीक कर्ज दरात वाढ
By Admin | Updated: May 23, 2014 00:14 IST2014-05-23T00:14:43+5:302014-05-23T00:14:43+5:30
जिल्हाभरातील शेतकर्यांना दिल्या जाणार्या कापूस, सोयाबीन या पीक कर्जाच्या दरात हेक्टरी दोन हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. त्यावर शुक्रवारी २३ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी

कापूस, सोयाबीनच्या पीक कर्ज दरात वाढ
यवतमाळ : जिल्हाभरातील शेतकर्यांना दिल्या जाणार्या कापूस, सोयाबीन या पीक कर्जाच्या दरात हेक्टरी दोन हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. त्यावर शुक्रवारी २३ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत निर्णय होणार आहे. कापसाला सध्या हेक्टरी ३० हजार तर सोयाबीनला २० हजार रुपये पीक कर्ज दिले जाते. त्यात दोन हजाराची वाढ करून अनुक्रमे ३२ व २२ हजार रुपये हेक्टरी कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने जिल्हा बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट यावेळी ६२१ कोटी ठरवून दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उद्दीष्ट तब्बल २०० कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकर्यांना खरीप हंगामासाठी जुन्याच दराने पीक कर्जाचे वाटप केले गेले. पीक कर्जाचा नवा दर ठरविण्यासाठी शुक्रवारी बँक संचालकांची बैठक होत आहे. या बैठकीत वाढीव दर मंजूर होताच कर्जातील उर्वरित रक्कम शेतकर्यांच्या मागणीनुसार त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. संचालक मंडळापुढे राज्य सहकारी बँकेचे कर्ज, जिल्हा बँकेच्या जुन्या पीक व मुदती कर्जाची वसुली, साहित्य खरेदी असे अनेक विषय चर्चेसाठी येणार आहेत. यंदाच्या ६२१ कोटींच्या उद्दीष्टापैकी आतापर्यंत दीडशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेने केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जाची उचल वाढणार आहे. या काळात बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची गर्दी पहायला मिळते. एकाच वेळी सर्वजण कर्ज उचलत असल्याने चलनी नोटांचा तुटवडा निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून आतापासूनच उपाययोजना केल्या गेल्याचे बँकेतून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या कर्ज वाटपाची वसुलीही बँकेने झपाट्याने सुरू केली असली तरी मुदती कर्जाच्या वसुलीत बँकेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीच्या ४२१ कोटींच्या पीक कर्ज वाटपापैकी ३०२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यात दुष्काळातील शासनाकडून परस्पर झालेल्या कर्ज वसुलीचाही समावेश आहे. कृषी विषयक विविध योजना व वाहन, व्यवसाय, उद्योगासाठी बँकेने १२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. परंतु त्यातील केवळ सहा कोटी रुपये वसूल झाले. ही वसुली वाढविण्याचे आव्हान बँकेपुढे आहे. (प्रतिनिधी)