काँग्रेसच्या महिला आरक्षण धोरणाला सुरुंग
By Admin | Updated: August 23, 2014 02:08 IST2014-08-23T02:08:52+5:302014-08-23T02:08:52+5:30
प्रत्येक जिल्ह्यात किमान एका तरी महिलेला काँग्रेसने विधानसभेचे तिकीट द्यावे, असा आग्रह असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र चक्क विद्यमान महिला आमदाराचेच तिकीट कापण्यासाठी पक्षाच्या ...

काँग्रेसच्या महिला आरक्षण धोरणाला सुरुंग
राजेश निस्ताने यवतमाळ
प्रत्येक जिल्ह्यात किमान एका तरी महिलेला काँग्रेसने विधानसभेचे तिकीट द्यावे, असा आग्रह असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र चक्क विद्यमान महिला आमदाराचेच तिकीट कापण्यासाठी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची धडपड सुरू आहे. काँग्रेसच्या या महिला आरक्षण धोरणाला प्रदेशाध्यक्षांच्या पुत्रप्रेमामुळे सुरुंग लावला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. त्यासंबंधीचा कायदा असल्याने त्याची अंमलबजावणी केली जाते. परंतु आमदारकीसाठी असा कायदा नाही. किमान त्याचे संकेत पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे यांनी विधानसभेसाठी ३३ टक्के जागा महिलांकरिता आरक्षित करावा, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी महिला आमदार असावा, अशी आग्रही मागणी केली आहे. एकीकडे प्रदेश महिला अध्यक्ष महिला आमदारांची संख्या वाढविण्यासाठी धडपडत असताना यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांचे तिकीट कापून महिला आमदारांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापून मुलगा राहुल ठाकरे याला यवतमाळची उमेदवारी देण्यासाठी फिल्डींग लावली आहे. नेतेच महिला धोरणाला सुरुंग लावत असल्याने त्यांच्याविरुद्ध महिला वर्गात रोष आहे. नंदिनी पारवेकर यांना आमदार होऊन अवघे दीड वर्षही झालेले नाही. त्यांच्याबाबत कुणाच्याही तक्रारी नाहीत. केवळ भाषिक अडचण सांगून त्यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस सारख्या सार्वभौम पक्षात केवळ भाषिक अडचणीमुळे आमदारकीचे तिकीट कापणे संयुक्तीक आहे का, असा महिलांचा प्रश्न आहे.
मुळात काँग्रेस पक्षाकडून महिलांचा सन्मान राखला जातो. केंद्रात सोनिया गांधींच्याच नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने यशस्वीरीत्या दहा वर्षे पूर्ण केली. त्यांच्याच पुढाकाराने देशाला प्रतिभाताई पाटील या महिला राष्ट्रपती लाभल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा प्रभाताई राव यांनी अनेक वर्षे सक्षमपणे सांभाळल्याचा इतिहास आहे. जिल्ह्यातील जनतेतूनही महिलांचा सन्मान राखला जातो. पोटनिवडणुकीमध्ये महिलांनी नंदिनी पारवेकरांना भरभरुन मते दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी जात-धर्म-पक्ष याचे कोणतेही बंधन न पाळता भावना गवळी यांना खासदार म्हणून मताधिक्याने चौथ्यांदा निवडून दिले. असे असताना महिला आमदाराचे तिकीट कापण्यासाठी प्रदेशकडून सुरू असलेली धडपड कुणालाही न रूचणारी आहे.
एखादवेळी नंदिनी पारवेकरांच्या नावाला विरोध असेल तर यवतमाळ मतदारसंघात आणखीही सक्षम महिला नेत्या कार्यरत आहेत. त्यात संध्याताई सव्वालाखे, अॅड. सीमाताई तेलंगे यांची नावे आघाडीवर आहेत. संध्याताई सव्वालाखे यांनी जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्यांची वर्णी लागली आहे. अॅड. सीमा तेलंगे यासुद्धा सध्या जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. आक्रमक, अभ्यासू व आंदोलक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. याशिवाय पक्षाला इतरही सक्षम महिलांचा उमेदवारीसाठी विचार करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार, वसंत पुरके या आमदारांना काँग्रेस गेल्या कित्येक वर्षांपासून पुन्हा-पुन्हा विधानसभेची उमेदवारी देत आहे. उमरखेडमध्ये विजय खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. असे असताना नंदिनी पारवेकरांचे अवघ्या दीडच वर्षात तिकीट कापण्यामागे कारण काय ? एवढ्या कमी वेळात तर मतदारसंघाचा, तेथील समस्यांचा अभ्यास करणे कुणालाही शक्य नाही.
महिलांनी केवळ चूल आणि मूलच सांभाळावे का असा जाब माणिकरांवाना विचारला जात आहे. माणिकराव महिलांचा सन्मान राखून यवतमाळ मतदारसंघात नंदिनी पारवेकरांचे तिकीट कायम ठेवतात की पूत्र प्रेमापोटी आपले वजन मुलगा राहुल ठाकरे याच्या पारड्यात टाकून नऊ लाख महिला मतदारांचा अप्रत्यक्ष अवमान करतात, याकडे नजरा लागल्या आहेत.