कोरोना घेऊन आलेले अखेर दिल्लीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:56+5:30

दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले.

Corona was finally brought to Delhi | कोरोना घेऊन आलेले अखेर दिल्लीला रवाना

कोरोना घेऊन आलेले अखेर दिल्लीला रवाना

ठळक मुद्दे‘मरकज’चे आठ पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह : उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालच्या नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिल्लीतील मरकजच्या संमेलनाला हजेरी लावून जिल्ह्यात दाखल झालेल्या व येताना सोबत कोरोना आजार घेऊन आलेल्या परप्रांतीय नागरिकांना शुक्रवारी अखेर दिल्लीला रवाना करण्यात आले. त्यामध्ये उत्तरप्रदेश व पश्चिम बंगालच्या नागरिकांचाही समावेश आहे.
दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले. या पॉझिटिव्ह परप्रांतीय नागरिकांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झाल्याने या आठ जणांसह ११ जणांना शुक्रवारी बडनेरा रेल्वे मार्गे दिल्लीकडे रवाना करण्यात आले. तेथून ते पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशाला आपल्या गावी जाणार आहेत.
वास्तविक दिल्लीच्या मरकज कनेक्शनचे एकूण २२ लोक आढळून आले होते. त्यापैकी ११ जण रवाना झाले. उर्वरित ११ जण पश्चिम बंगालचे असून त्यांनाही पुढील तीन-चार दिवसात आपल्या गावी रवाना केले जाणार आहे. या ११ पैकी एकाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जाते.
कोरोनाबाबत एकूणच जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. सुरुवातीला मुंबई, पुण्यानंतर यवतमाळातच कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे यवतमाळ अचानक देशाच्या नकाशावर चमकले.
भोसा येथे उद्रेक झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. एवढेच नव्हे तर नेर व उमरखेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु आता कोरोना संसर्ग सध्यातरी जिल्ह्यात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणेचे परिश्रम, नागरिकांची जागरुकता, व्यापारी-व्यावसायिकांचा संयम याला हे संपूर्ण श्रेय दिले जात आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा शंभरवर गेला आहे. परंतु त्यातील रुग्ण पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये येत आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा वेग चांगला आहे. सध्या ४५ बाधितांवर उपचार सुरू आहे.

५५ जण झाले कोरोनामुक्त, आता केवळ ४५ बाधितांवर उपचार
जिल्ह्यात अचानक वाढलेला कोरोना गेल्या आठवडाभरापासून चांगलाच नियंत्रणात आला आहे. ५५ जण कोरोनामुक्त झाले आहे. आता केवळ ४५ जण बाधित म्हणून उपचार घेत आहे. तेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी सतत जागरुक राहून दाखविलेला संयम फायद्याचा ठरल्याचे मानले जाते. नागरिकांनी घरात राहून लॉकडाऊनचे काटेकोर पालन केल्यानेच आज जिल्ह्याने कोरोनासारख्या महामारीवर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.

Web Title: Corona was finally brought to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.