उमरखेडच्या मतखंडामध्ये कोरोनाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:15+5:30
खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यात तब्बल ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

उमरखेडच्या मतखंडामध्ये कोरोनाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील मतखंड परिसरातील खरूस येथे तब्बल ३१ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे संपूर्ण मतखंड परिसरातच कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यात तब्बल ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उर्वरित ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मोठ्या प्रमाणात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मतखंडात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार १३६ नागरिकांचे स्वॅब तपासण्यात आले आहे. रविवारी तब्बल २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापाठोपाठ सोमवारीही ३१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मतखंडासह संपूर्ण तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने पाच जणांचे बळी गेले आहे. त्यात खरूस व नागापूर येथील प्रत्येकी एक महिला, ढाणकीचा एक पुरुष आणि उमरखेड शहरातील एक पुरुष व महिलेचा समावेश आहे. नव्याने पंचायत समितीचे कर्मचारी व पदाधिकारी पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विविध शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची धास्ती निर्माण झाली.
अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११३ वर
तालुक्यात आतापर्यंत १५८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४२ जणांना उपचाराअंती सुटी देण्यात आली. आता तालुक्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११३ झाली आहे. शहरासह ढाणकी, नागापूर, खरूस गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय यंत्रणा उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यात अद्याप यश आले नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.