कोरोनामुळे १५ तालुक्यांसाठी यवतमाळ बनले पुणे-मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:12+5:30
तालुक्यात नोकरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घर हा प्रकार यवतमाळसाठी काही नवा नाही. दारव्हा, महागाव, राळेगाव, आर्णी, घाटंजी, नेर अशा तालुक्यांत नोकरी करणारे शेकडो कर्मचारी यवतमाळात राहतात. मात्र आता यवतमाळातून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे १५ तालुक्यांसाठी यवतमाळ बनले पुणे-मुंबई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुणे आणि मुंबईतून मूळगावात परतलेल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी कोरोनामुळे कडवा विरोध केला. जिल्ह्यातील खेडूतांनी पुण्या-मुंबईत राहणाऱ्या पोटच्या पोरांनाही ‘सध्याच येऊ नका’ असे निरोप दिले होते. मात्र आता खुद्द यवतमाळ शहरातच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील १५ तालुक्यांनी यवतमाळ शहरालाच ‘पुण्या-मुंबई’चे स्थान दिले आहे. यवतमाळातून तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाला अडविले जात आहे.
तालुक्यात नोकरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घर हा प्रकार यवतमाळसाठी काही नवा नाही. दारव्हा, महागाव, राळेगाव, आर्णी, घाटंजी, नेर अशा तालुक्यांत नोकरी करणारे शेकडो कर्मचारी यवतमाळात राहतात. मात्र आता यवतमाळातून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
या बाबीचा परिणाम म्हणजे, घाटंजी प्रशासनाने यवतमाळकडून गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहे. मानोली ते खापरी नाका या परिसरापर्यंत प्रत्येक रस्त्यावर बांबू लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर राळेगावातील कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यवतमाळातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांनी यवतमाळातून अप-डाऊन थांबवावे आणि मुख्यालयीच मुक्कामी राहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
घरभाडे भत्ता, एकस्तर वेतनश्रेणीत बनवाबनवी
अनेक कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी किंवा त्याही पलिकडे खेड्यात नोकरीला आहेत. मात्र ते यवतमाळातून अप-डाउन करतात. तर दुसरीकडे मुख्यालयी राहत असल्याचे सांगत घरभाडे भत्ता, एकस्तर वेतनश्रेणी, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता आदी आर्थिक लाभ लाटत आहेत. कोरोनाच्या धाकापायी गावकऱ्यांनी मनाई केल्यावरही हे कर्मचारी यवतमाळातून जाणे-येणे करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांचे संबंधित आर्थिक लाभ बंद करावे, अशी मागणी होत आहे.
घाटंजी येथे महिला अधिकाऱ्याला फटका
घाटंजी पंचायत समितीत एक महिला अधिकारी यवतमाळातून येणे-जाणे करते. मात्र सध्या या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाण्यास कर्मचारीच घाबरत आहे. चक्क केबिनच्या दाराबाहेर उभे राहून कर्मचारी या अधिकाºयांशी संवाद साधत आहे.