कोरोनाने दिवसभरात महिलेसह तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:15+5:30
सोमवारी मृत्यू झालेल्या या तीनही रुग्णांमध्ये सारीचीही लक्षणे आढळली होती. पुसद येथील मृतक १३ जूनपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होता. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर दारव्हा येथील मृतांपैकी पुरुष सोमवारी सकाळी यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

कोरोनाने दिवसभरात महिलेसह तिघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाग्रस्तांचा ‘रिकव्हरी रेट’ उत्तम राखणाऱ्या जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात पुसद शहरातील ६० वर्षीय इसमासह दारव्हा शहरातील ६६ वर्षीय महिला व ४५ वर्षीय अन्य एका पुरुषाचा समावेश आहे.
सोमवारी मृत्यू झालेल्या या तीनही रुग्णांमध्ये सारीचीही लक्षणे आढळली होती. पुसद येथील मृतक १३ जूनपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होता. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर दारव्हा येथील मृतांपैकी पुरुष सोमवारी सकाळी यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तर महिला यवतमाळकडे येत असताना वाटेतच दगावली. मृत्यूनंतर झालेल्या स्वॅब तपासणीत या दोघांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दीडशेच्या पार जाऊनही एकाही रुग्णाचा मृत्यू ओढवणार नाही याची प्रशासनाने पुरेपूर काळजी घेतली होती. गेल्या साडेतीन महिन्यात हे यश कायम होते. मात्र मागील पंधरवाड्यापासून रुग्ण संख्येसोबतच मृत्यू संख्याही वाढत आहे. १५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल सात जणांचा बळी घेतला. नेर येथील इसमाचा दोन आठवड्यापूर्वी बळी गेला. तेव्हा कोरोना विषाणूने ग्रामीण भागात पाय पसरल्याचे स्पष्ट झाले. त्या पाठोपाठ महागाव तालुक्यातील मुडाणा-साधूनगर येथीलही इसमाचा मृत्यू झाला. या दोन मृत्यूमुळे जिल्हा प्रशासनाने तालुका पातळीवरील उपाययोजना अधिक कडक केल्या. नाशिकमधून नेरमध्ये खताचा ट्रक घेऊन आलेला चालकही कोरोनामुळे नेरमध्येच दगावला. त्या पाठोपाठ तीन दिवसांपूर्वी नेरमधीलच ८३ वर्षीय वृद्धाचा मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात मृत्यू झाला. आता प्रशासनाने नेर, पुसद, दारव्हा, महागाव आदी ठिकाणी कडक उपाय हाती घेतले आहे. मात्र राज्याच्या रेड झोनमधून जिल्ह्यात मजुरांचे ‘ईनकमिंग’ सुरू झाल्याने कोरोनाचे संक्रमणही वाढतच राहिले. त्यातूनच पुसद आणि दारव्हा सारख्या तालुकास्थळावरही कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावातून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये, नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.
दारव्हा शहरात आजपासून जनता कर्फ्यू
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सोमवार १५ जूनपासून नेर नगरपरिषद क्षेत्रात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. तर दारव्हा शहरातही बाधितांची संख्या वाढत असल्याने मंगळवार १६ जूनपासून जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही शहरातील कोरोनाचा उद्रेक असलेला परिसर सील करण्यात आला आहे.
दोघे कोरोनामुक्त
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात भरती असलेले आणखी दोघे कोरोनामुक्त झाले. हे दोघेही नागापूर ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. त्यामुळे सोमवारी मेडिकल प्रशासनाने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. सध्या ३० अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह ३९ जण आयसोलेशन वार्डात भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८६ रुग्ण आढळले. त्यातील १४८ जण बरे झाले.