१५ हजार कुटुंबांचे कोरोना संसर्ग सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन -३ जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील १४ प्रभागात ...

Corona infection survey of 15,000 families | १५ हजार कुटुंबांचे कोरोना संसर्ग सर्वेक्षण

१५ हजार कुटुंबांचे कोरोना संसर्ग सर्वेक्षण

ठळक मुद्देपुसद शहर : ७९९ नागरिक बाहेरगावाहून आले, आरोग्यविषयक माहिती केली गोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन -३ जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील १४ प्रभागात तब्बल १४ हजार ७०५ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी खास ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करुन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. सर्वेक्षणात कोरोना लक्षणे असलेली एकही व्यक्ती आढळली नाही. या सर्वेक्षणात तब्बल ७९९ नागरिक बाहेरगावाहून आल्याचीही माहिती मिळाली आहे. येथील महसूल, आरोग्य, पोलीस व नगरपरिषद यंत्रणा ‘अलर्ट’ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासन व प्रशासन स्तरावर विशेष दक्षता घेतली जात आहे.
त्या अनुषंगाने नगरपरिषदेने ६ ते ३० एप्रिल या कालावधीत १४ प्रभागातील २९ वॉर्डातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती गोळा केली. शहरात एकूण २० हजार ४६० मालमत्ता असून, १४ हजार ७०५ कुटुंबे आहेत. शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. कोरोना संसर्ग सर्वेक्षण करण्यासाठी ८० कर्मचारी तैनात करण्यात आले. यात पालिकेचे शिक्षक व कर्मचारी, नागरी आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशासेविका, कर विभागातील कर्मचारी आदींचा समावेश होता.
पाच-पाचच्या चमूने प्रत्येक घरी जावून घरमालकाच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. सदस्यांची आरोग्यविषयक माहिती गोळा केली. त्यांच्याकडे बाहेर गावचे कोणी पाहुणे आले काय?, त्यांची माहिती घेऊन वैद्यकीय तपासणी करावयास लावणे, आदी कामे केली. कोरोनाच्या संकटात जीवाची जोखीम पत्कारून या कर्मचाºयांनी संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केले. पुणे, मुंबई, दिल्ली व इतर राज्यातूल आलेल्यांची नोंद घेतली. या सर्वेक्षणाअंती एकही कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने पुसदच्या प्रशासनाने तूर्त सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मंडई चालकांविरुद्घ पोलिसांकडे तक्रार
गर्दी होऊ नये, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, या उद्देशाने फळे व भाजीपाला मंडई चालकांना मंडई बंद ठेवण्याबाबत सूचित केले होते. मात्र २४ एप्रिल रोजी ताजखाँ दाऊदखाँ, अब्दुल मुजाहिद अब्दुल कदीर व शेख रहिम यांनी सूचनेचे पालन न करता भाजीपाला लिलाव सुरु ठेवला. त्यावरुन पालिकेने पोलिसांच्या मदतीने लिलाव बंद केला. या मंडई चालकांविरुद्घ पोलिसांत तक्रार देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांनी दिली.

Web Title: Corona infection survey of 15,000 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.