सुपर स्पेशालिटीचे बांधकाम आॅगस्टपासून

By Admin | Updated: June 6, 2016 02:52 IST2016-06-06T02:52:38+5:302016-06-06T02:52:38+5:30

आठ प्रकारच्या आरोग्य सुविधा देणाऱ्या यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाने १५० कोटी

Construction of Super Specialty from August | सुपर स्पेशालिटीचे बांधकाम आॅगस्टपासून

सुपर स्पेशालिटीचे बांधकाम आॅगस्टपासून

यवतमाळ : आठ प्रकारच्या आरोग्य सुविधा देणाऱ्या यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले आहे. २१० खाटांच्या या हॉस्पिटल बांधकामाला येत्या आॅगस्ट महिन्यापासून प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
बळीराजा चेतना अभियान, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे, खासदार भावना गवळी, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार मदन येरावार, आमदार मनोहरराव नाईक, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. अशोक उईके, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक टी.जी. धोटे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रोगराई वाढली आहे, त्यावरील उपचाराचा खर्चही वाढत आहे. पैशाअभावी पूर्वी लोक मृत्युमुखी पडायचे आता तंत्रज्ञान वाढले आहे. परंतु खर्चाच्या विवंचनेत अनेक जण उपचार घेण्याचे टाळतात. त्यामुळेच गोरगरीब व वंचित घटकांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आयोजित महाआरोग्य शिबिर कमालीचे यशस्वी होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने हजारो रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या शिबिरात २० हजार रुग्णांची नोंदणी झाली आहे. शेवटच्या रुग्णावर उपचार होईपर्यंत शिबिर चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची आरोग्य सेवा चांगली आहे. राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराअभावी राहू नये यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. गरजूंनी आपल्या भागातील आमदारांशी संपर्क साधावा. कितीही महागडे उपचार असले तरी आम्ही ते करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, आतापर्यंत सुमारे १८०० मुकबधीर बालकांची नोंदणी झाली आहे. उपचारासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून टाटा व केंद्राच्या मदतीतून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. एकही मुकबधीर मुलगा उपचाराअभावी राहणार नाही, असे ते म्हणाले. पालकमंत्री संजय राठोड यांनी सुदृढ समाज निर्मितीसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केल्याचे सांगत तपासणीनंतर पुणे, मुंबई, नागपूर येथे उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाआरोग्य शिबिरात जिल्हाभरातील हजारो रुग्ण आल्याने मेडिकल परिसरात प्रचंड गर्दी दिसत होती. (कार्यालय प्रतिनिधी)

केंद्राकडे तीन हजार कोटींची मागणी
४राज्यात ११ हजार गावात दुष्काळ जाहीर झाला आहे. केंद्र शासनाची टीम पाहणी करून गेली आहे. आतापर्यंत चार हजार कोटी रुपये केंद्राकडून पहिला हप्ता म्हणून प्राप्त झाले. पुन्हा तीन हजार कोटी रुपयांची मागणी दुष्काळी मदतीसाठी केंद्राकडे करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ५० टक्के पेक्षा अधिक पाऊस पडल्यास केंद्र शासनाच्या नियमानुसार दुष्काळी मदत मिळत नाही. परंतु राज्यात ५० टक्केपेक्षा जास्त पाऊस पडूनही विशेष मदत म्हणून केंद्र सरकार आपणास विशेष मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. शेतकऱ्यांना एका वर्षात पीक विम्याच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय शल्यचिकित्सक
४परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी महाआरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना राजकीय शल्यचिकित्सक अशी उपाधी अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना देत त्यांनी नुकतीच मुंबईत मोठी राजकीय शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. या शस्त्रक्रियेतून इतर मंत्र्यांनी धडा घेतला असून प्रत्येक जण जनसामान्यांच्या कामासाठी धडपडत असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा शनिवारी झालेला राजीनामा आणि दिवाकर रावते यांनी राजकीय शल्यचिकित्सक म्हणून दिलेली उपाधी सभास्थळी चर्चेचा विषय झाली होती.

४यवतमाळ तालुक्यातील किटा येथील जलयुक्त शिवार कामांची पाहणी, किटा गावचे डोह निर्मितीसह गॅबियन बंधारा जलसंधारणाचे आदर्श मॉडेल
४यवतमाळ येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात दहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन
४यवतमाळ बसस्थानक चौकात कृषी विभागाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र (मॉल) तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

Web Title: Construction of Super Specialty from August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.