आदिवासींना विस्थापित करण्याचे षड्यंत्र
By Admin | Updated: May 15, 2014 23:58 IST2014-05-15T23:58:05+5:302014-05-15T23:58:05+5:30
यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.

आदिवासींना विस्थापित करण्याचे षड्यंत्र
यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.१८५७ च्या बंडाचा खोटा इतिहास समोर करून इतिहासकारांनी खरा इतिहास दडपण्याचे काम केले. आदिवासी हा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, त्यांची एक वैभवशाली संस्कृती आहे. जल, जंगल व जमिनीची अहोरात्र सुरक्षा करणार्या आदिवासींना प्रस्थापित व्यवस्थेने विस्थापित करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा घनाघाती आरोप संथाली लेखक ग्लॅस्सन डुंगडुंग यांनी केला. येथील समता पर्वात आयोजित ‘सरकार, नक्षलवाद व जीर्ण संस्कृतीच्या त्रिकोणात अडकलेला आदिवासी समाज’ या अखेरच्या विचारवेध सत्रात ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर पश्चिम बंगाल येथील रूबी हेम्ब्राम, प्रा. डॉ. सुनंदा वालदे, मंगला दिघाडे, प्रा. डॉ. छाया महाले, प्रा. माधव सरकुंडे. ज्ञानेश्वर गोबरे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, आदिवासी हा इमानदार व सभ्यता पाळणारा समूदाय आहे. त्याने निसर्गाचे रक्षण करून निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवले आहे. मात्र सरकार जमिनदारांच्या माध्यमातून आदिवासींना गुन्हेगार ठरवून त्यांच्या जमिनी लुटत आहे. इंग्रजांच्या काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळामध्येही आदिवासींना नकारात्मक व अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. आदिवासी समाजात मुलगा- मुलगी असा भेद पाळल्या जात नाही.आदिवासींच्या आंदोलनाला नक्षलवादाचे स्वरूप देऊन आंदोलन दडपण्यात येत असल्याचा आरोपही डुंगडुंग यांनी यावेळी केला. यावेळी रूबी हेम्ब्राम यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)