आत्महत्येचा विचार येतोय, थेट कलेक्टरला फोन करा

By Admin | Updated: May 19, 2015 01:32 IST2015-05-19T01:32:12+5:302015-05-19T01:32:12+5:30

शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, तसा विचार जरी डोक्यात आला तरी टोकाचा कोणताही

Considering suicide, call the live collector | आत्महत्येचा विचार येतोय, थेट कलेक्टरला फोन करा

आत्महत्येचा विचार येतोय, थेट कलेक्टरला फोन करा

यवतमाळ : शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, तसा विचार जरी डोक्यात आला तरी टोकाचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एक फोन थेट मला करा, असे भावनिक आवाहन यवतमाळचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे.
सिंग यांचे सोमवारी सायंकाळी परभणीवरून आगमन झाले. त्यानंतर येथील जिल्हाधिकारी पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांवर आणि विशेषत: शेतकरी आत्महत्यांवर सिंग यांनी यवतमाळचे मावळते आणि परभणीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंग यांनी ‘लोकमत’शी बातचित केली.
सिंग म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच प्रशासनाचा फोकस यवतमाळवर आहे. या आत्महत्या पुढील दोन वर्षात दिसणार नाहीत, या दृष्टीने उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्ज व नापिकी हे प्रमुख कारण असले तरी शेतकऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. असे टोकाचे पाऊल उचलून आपल्या कुटुंबाला उघड्यावर सोडू नये. आत्महत्येचा विचार मनाला शिवणारसुद्धा नाही, असा प्रयत्न करावा. तरीही तसा विचार आल्यास जिल्हाधिकारी म्हणून थेट आपल्याशी ९४२२८८५५११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. हा फोन २४ तास सुरू राहील. त्या एका कॉलवर तुमच्या मनातील आत्महत्येचा विचार दूर फेकण्याचा, तुम्हाला जगण्याची नवी आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा शब्दात सिंग यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, परभणीमध्येही कमी अधिक प्रमाणात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे. तेथे शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी, प्रशासन तुमच्या सोबत आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी ‘उमेद’ प्रकल्प राबविला जात आहे. यवतमाळातही हा प्रकल्प शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवी आशा निर्माण करेल. शासन-प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच प्रत्येक उपविभागात प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे. ते या आत्महत्यांची नेमकी कारणमिमांसा करणार असून त्यानंतर शासनाचे धोरण ठरणार आहे. महसूल यंत्रणेवर विविध अभियान, योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे ताण येत असल्याची बाब सिंग यांनी मान्य केली. मात्र हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा महसूल यंत्रणेचीच असल्याचे स्मरणही त्यांनी यावेळी करून दिले. राहुल रंजन महिवाल यांनी अलिकडे रेती घाटांवर धाड सत्र राबविले होते. ते पुढेही सुरू राहणार असल्याचे सूतोवाच सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Considering suicide, call the live collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.