काँग्रेसचे किसान बचाओ आंदोलन
By Admin | Updated: June 19, 2015 02:15 IST2015-06-19T02:15:10+5:302015-06-19T02:15:10+5:30
संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला लागवड खर्चावर आधारित बाजारभाव देण्याचे आश्वासन निवडणूक काळात भाजप सरकारने दिले होते.

काँग्रेसचे किसान बचाओ आंदोलन
वामनराव कासावार : भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप
यवतमाळ : संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला लागवड खर्चावर आधारित बाजारभाव देण्याचे आश्वासन निवडणूक काळात भाजप सरकारने दिले होते. प्रत्यक्षात मात्र या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री मुक्कामी राहिलेल्या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवेला आत्महत्या करावी लागली. या पिंप्री बुटी गावातूनच काँग्रेस किसान बचाओ व कर्जमुक्ती आंदोलन छेडणार आहे. २७ जून रोजी याची सुरूवात करणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष वामनराव कासावर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
भाजपा सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सातत्याने थट्टा चालविली आहे. जिल्ह्यालाला लागलेला आत्महत्येचा कलंक हा भाजपाच्या फसव्या आश्वासनाने अधिक गडद होत चालला आहे. त्यासाठीच यवतमाळ तालुक्यातील पिंप्री बुटी येथून किसान बचाओ व कर्जमुक्ती आंदोलन सुरू केले जात आहे. २७ जूनला पिंप्री बुटी ते अकोला बाजार असा पाच किलोमीटर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहभागी होत आहे. या मोर्चाचे अकोला बाजार येथे सभेत रुपांतर होणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अद्यापही कर्ज पुनर्गठण झाले नाही. सावकारी कर्जमाफीचाही लाभ मिळालेला नाही. यामुळेच आत्महत्या वाढत असल्याचे कासावार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, देवानंद पवार, राहुल ठाकरे, विजयाताई धोटे, अरुण राऊत, आनंद गायकवाड, दिनेश गोगरकर, उमेश इंगळे आदी उपस्थित होते.
(कार्यालय प्रतिनिधी)