यवतमाळात काँग्रेस गटनेतेपदाचा पोरखेळ
By Admin | Updated: July 20, 2014 00:09 IST2014-07-20T00:09:39+5:302014-07-20T00:09:39+5:30
शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे.

यवतमाळात काँग्रेस गटनेतेपदाचा पोरखेळ
यवतमाळ : शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी अर्ध्या तासाच्या फरकाने दोन नगरसेवकांना गटनेता म्हणून नियुक्तीपत्र दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
नगरपरिषदेत काँग्रेसमध्ये कुणाचाच पायपोस कुणाला नसल्याचे दिसते. गटनेता निवडीवरून निर्माण झालेला वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी समेटासाठी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलाविली.
यावेळी नगरसेवक अमोल देशमुख यांना गटनेता म्हणून नियुक्त करीत असल्याचे पत्र जिल्हाध्यक्षांनी दिले. त्यांना सात नगरसेवकांचे समर्थन आहे. मात्र त्यानंतर अर्ध्या तासातच अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अमोल देशमुख यांची नियुक्ती रद्द ठरवत न्यायालयाच्या निकालाप्रमाणे जाफर सादिक गिलाणी गटनेते राहतील, असे पत्र दिले. काँग्रेससारख्या पक्षात गटनेता निवडण्यावरून एवढी मोठी विसंगती आणि विवाद उद्भवत असल्याचे चित्र पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. नगरसेवकांमध्ये दोन गट असून निलंबित नगरसेवक
बाळासाहेब चौधरी यांच्या बाजूने सात सदस्य तर चार सदस्यांचा वेगळा गट आहे. ही गटबाजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही कायम असल्याचे काल पुन्हा सिद्ध झाले. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या एकाही नेत्याने आपल्या नगरसेवकांना बोलावून सूचना दिल्या नाही.
यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत सुसंवाद संपल्याचे स्पष्ट होते. आज नगरपरिषदेत काँग्रेसकडे ११ नगरसेवक असले तरी त्यापैकी पक्षाचे किती हा प्रश्न निर्माण झाला आहे. नेत्यांमधील विसंगतीमुळे गटनेतेपदाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहे. यात काय घडामोडी होतात याची उत्सुकता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)