अध्यक्षपदावर काँग्रेसचे पाणी

By Admin | Updated: September 21, 2014 00:02 IST2014-09-21T00:02:58+5:302014-09-21T00:02:58+5:30

जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा

Congress water for president | अध्यक्षपदावर काँग्रेसचे पाणी

अध्यक्षपदावर काँग्रेसचे पाणी

पुत्र प्रेम : काँग्रेस आमदारांना उमेदवारीचीच अधिक चिंता
यवतमाळ : जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा आचारसंहितेत आल्याने येथेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुत्रप्रेम आडवे आले. मुलाचा विधानसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अटी शर्तींकडे पूर्णत: डोळेझाक केली जात आहे. स्थानिक काँग्रेस आमदारांनाही विधानसभेचे डोहाळे लागल्याने जिल्हा परिषदेत काहीच देणे घेणे नसल्याची चर्चा काँग्रेस गोटात सुरू आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसची चांगलीच फरफट झाली. याचा वचपा काढण्याची संधी चालून आली. मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका कायम ठेवत काँग्रेसला नमते घेण्यास भाग पाडले. शिवाय विधानसभा निवडणूक असल्याने काँग्रेस आमदारांनीही जिल्हा परिषदेत फार लक्ष घातले नाही. प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी आपल्या पुत्राला अध्यक्ष बनविण्यासाठी २००९ मध्ये सहयोगी असलेल्या राष्ट्रवादीला बाजूला बसवून मुत्सदेगिरी दाखवत काँग्रेसची सत्ता स्थापन केली. आता अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने त्यांना या पदात स्वारस्य नाही. उलट यवतमाळ विधानसभेतून मुलाची उमेदवारी कशी निश्चित होईल याचा खटाटोप सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादीला चुचकारून विरोध कसा कमी करता येईल अशीच भूमिका घेण्यात आली. याच काळात काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी आपल्या पुतण्याला पद मिळण्यासाठी खटाटोप केला. शिवाजीराव मोघे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकासाठी शब्द टाकला. आता मात्र ही नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांनी पूर्णत: जिल्हा परिषदेतील निवड प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांची संयुक्त बैठकही घेतली नाही. सदस्यांची काय भूमिका आहे, हे विचारण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. प्रत्येकाला विधानसभेचे डोहाळे लागले आहे, अशी चर्चा दबक्या स्वरात काँग्रेस सदस्यांमध्ये सुरू आहे. औपचारिकता म्हणून २१ सप्टेंबरला सकाळी बैठक बोलवली आहे. त्यानंतर विधानसभेच्या प्रचार धुमाळीतच ४ आॅक्टोबरला विषय समित्यांची निवड होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नेतेमंडळी सदस्यांनी निर्णय घ्यावा असेही उघडपणे बोलायला तयार नाही. शिवाय त्यांच्याकडे या निवड प्रक्रियेसाठी देण्याकरिता वेळही नाही. त्यामुळेच काँग्रेसचे पद वाटपात नुकसान होत असल्याची खंत काही सदस्यांनी व्यक्त केली.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Congress water for president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.