काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी केला मोदी सरकारचा निषेध
By Admin | Updated: June 17, 2016 02:41 IST2016-06-17T02:41:53+5:302016-06-17T02:41:53+5:30
दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा

काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी केला मोदी सरकारचा निषेध
‘चाय की चर्चा’ : मोदींच्या पदवी आणि चहा विक्रीवर व्यक्त केला संशय
आर्णी : दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा गुरुवारी काँग्रेसने काळा चहा पिऊन निषेध नोंदविला. आर्णी येथील दाभडी रोडवर हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला केंद्रात दोन वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हे प्रतिकात्मक आंदोलन येथे केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिग्वीजयसिंग, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरींदरसिंग ब्रार, खासदार राज बब्बर, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार अमित झणक, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, उत्तर प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंग, तेलंगणाचे माजीमंत्री रामचंद्र रेड्डी, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, संजय देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, विजयाताई धोटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, भारत राठोड, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजीराव मोघे यांनी केले.
यावेळी दिग्वीजयसिंग यांनी मोदी सरकारच्या कारभारावर कठोर शब्दात टीका केली. त्यांनी मोदींची चहा विक्री आणि महाविद्यालयीन पदवीवर संशय व्यक्त करताना त्यांचा मित्र अथवा चहा खरेदीदार दाखविल्यास दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. अशोकराव चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे काहीही भले केले नाही. शेतकऱ्यांनी आता काळजी करू नये, कारण त्यांची लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसल्याचे राज बब्बर यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. तर कार्यक्रमाचे संचालन नगराध्यक्ष आरीज बेग यांनी केले. या कार्यक्रमाला शेतकरी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भर ुउन्हातही नागरिक पूर्णवेळ थांबून होते. पाहुण्यांचे बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आगमन झाले.
काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी, मनसेने काँग्रेस विरोधी पत्रके वाटली. (शहर प्रतिनिधी)