काँग्रेस नेत्यांना चिंतनाचीही गरज नाही !

By Admin | Updated: November 18, 2014 23:02 IST2014-11-18T23:02:20+5:302014-11-18T23:02:20+5:30

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना लोटला आहे. परंतु जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही या पराभवाचे चिंतन करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. चिंतन बैठक घेतल्यास

Congress leaders do not even have to meditate! | काँग्रेस नेत्यांना चिंतनाचीही गरज नाही !

काँग्रेस नेत्यांना चिंतनाचीही गरज नाही !

तब्बल महिना लोटला : कार्यकर्त्यांकडून धारेवर धरले जाण्याची भीती
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना लोटला आहे. परंतु जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही या पराभवाचे चिंतन करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. चिंतन बैठक घेतल्यास धाडसी कार्यकर्त्यांकडून चिरफाड होण्याची हूरहूरही या नेत्यांना आहे.
जिल्ह्यात वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड या काँग्रेसच्या हाती असलेल्या पाचही जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. विधानसभा निवडणुकांचा दीर्घ अनुभव पाठिशी असलेल्या दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभूत करून भाजपाचे नवखे चेहरे निवडून आले आहेत. काँग्रेसच्या या नेत्यांना मतदारांनीच धडा शिकविला आहे. निवडून देणाऱ्या मतदारांची कामे न करणे, कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, त्यांची साधी शिफारस पत्राचीही कामे न होणे, मतदारसंघात संपर्कात न राहणे, सामान्यांच्या विकास कामाऐवजी मोठ्या मार्जीनच्या कामांना प्राधान्य देणे, निवडक कार्यकर्ते-कंत्राटदारांच्या चौकडीत वावरणे, निष्ठावंतांना डावलणे आदी कारणे काँग्रेसच्या पराभवासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेत्यांचेच वेगवेगळे गट पडले. पर्यायाने कार्यकर्तेही विभागले गेले. पक्षाच्याच नेत्यांच्या विरोधात या कार्यकर्त्यांना वापरले गेले. अखेर मतदारांनी काँग्रेसच्या या गटातटाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना पराभूत केले.
विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसचे हे नेते खळबडून जागे होतील, पुन्हा मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या गावात जातील, मतदारांनी आपल्याला नेमके का नाकारले, याचे आत्मचिंतन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असे काहीही होताना दिसत नाही. काँग्रेसचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात पराभूत होऊनही जिल्हा काँग्रेस कमिटीला या पराभवाची कारणमिमांसा करण्याची गरज वाटली नाही. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या मात्र पराभवावर त्यात ब्रसुद्धा काढला गेला नाही. काँग्रेसने पराभवाची कारणे शोधण्यासाठी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक बोलविल्यास हे कार्यकर्ते धारेवर धरण्याची भीती या नेत्यांना वाटत असल्याची काँग्रेसच्याच गोटातील माहिती आहे. शरद पवारांनी मंगळवारी अलिबागमध्ये चिंतन बैठक घेऊन सरकारच्या अस्थिरतेचे आणि कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत दिले. काँग्रेसच्या गोटात मात्र सर्वत्र सामसूम आहे. काँग्रेस पराभवामागे सारखीच कारणे आहे. पराभवानंतरही काँग्रेसचे नेते जनतेच्या दरबारात गेले नाहीत. जिल्ह्यातील दोन हजार गावातील शेतकरी दुष्काळाचा सामना करतो आहे. मात्र पराभूत आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. विरोधी पक्षात असल्याने या पराभूत आमदारांकडून जनता मोर्चे-आंदोलनांची अपेक्षा ठेऊन आहे. मात्र या नेत्यांनी अद्यापही आपल्या आलिशान वाहनांचे काळे काच खाली केलेले नाहीत, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress leaders do not even have to meditate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.