काँग्रेसने खाल्ली हाय
By Admin | Updated: May 24, 2014 00:16 IST2014-05-24T00:16:27+5:302014-05-24T00:16:27+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने काँग्रेसने जणू हाय खाल्ली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊनही काँग्रेसची यंत्रणा सैरभैर आहे. काँग्रेसचे आमदार मात्र निवडणूक लढण्याचीही हिंमत

काँग्रेसने खाल्ली हाय
विधानसभा : लढण्याची हिंमत अन् पद सोडण्याची तयारी नाही
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने काँग्रेसने जणू हाय खाल्ली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊनही काँग्रेसची यंत्रणा सैरभैर आहे. काँग्रेसचे आमदार मात्र निवडणूक लढण्याचीही हिंमत दाखवित नाही आणि आमदारकीचा दावा सोडण्याचीही त्यांची हिंमत नसल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे पानीपत झाले. राष्टÑवादीला चार तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. काँग्रेस पेक्षा राष्टÑवादीच्याच जागा अधिक आल्याने आधीच चिंतेचे वातावरण आहे. मराठवाडा वगळता इतरत्र काँग्रेसचा सफाया झाला आहे. या धक्क्यातून काँग्रेसचे मंत्री, आमदार व पदाधिकारी अद्याप सावरलेले नाही. सध्या मुंबईत पराभवावर चिंतन केले जात आहे. प्रत्येक जण ‘मोदी लाट’ सांगत असले तरी काँग्रेसमधील उणिवांवर अप्रत्यक्ष पडदा टाकला जात आहे. लोकसभेची निवडणूक ही मुळात काँग्रेस म्हणून लढलीच गेली नाही तर गटा-तटाचा उमेदवार म्हणून ती लढली गेल्याने पक्षाला अपयश आले. चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मोदीत्वाचे कवित्व संपता संपेना. त्यामुळे मोदी लाटेचे सावट विधानसभेपर्यंत कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी भाजपा-सेनेची मंडळी जोरदार तयारीला लागली आहे. काँग्रेसमध्ये मात्र अद्यापही सामसूम आहे. काँग्रेसचे नेते लोकसभेतील पराभवाच्या शॉकमधून अद्यापही बाहेर निघालेले नाही. विधानसभा निवडणुकीबाबत यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या तरी कुणीही आमदार बेधडकपणे निवडणूक रिंगणात उतरण्यास सहजासहजी तयार होताना दिसत नाही. तर त्याच वेळी पराभव होईल, म्हणून आपली जागा इतर कुणाला देण्याची तयारीही हे आमदार दाखवित नाही. विधानसभेत आतापासूनच काँग्रेस पराभवाच्या सावटाच्या वातावरणात वावरत आहे. त्यानंतरही कुणी दावा सोडण्यास तयार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी पुसद मतदारसंघावर राष्टÑवादीचा दावा आहे. गेल्या पाच वर्षात पक्षाची ताकद वाढल्याचे सांगून राष्टÑवादीने आतापासूनच यवतमाळ मतदारसंघ मिळविण्यासाठी दबाव वाढविला आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या पाचही मतदारसंघात आघाडीला पोषक वातावरण नाही. त्यातही आर्णी, वणी, यवतमाळ आणि उमरखेड या मतदारसंघात काँग्रेसची स्थिती आतापासूनच डामाडोल मानली जात आहे. शिवाजीराव मोघे आमदार असलेल्या आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघात यावेळी उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे. पिता की पूत्र यावर चर्चा होत आहे. मोघेंच्या मतदारसंघात लोकसभेमध्ये भाजपाला ६० हजार मतांची आघाडी मिळाल्याने विधानसभेतही मतदारांचा कौल काय असेल याचा अंदाज येऊ लागला आहे. ते पाहूनच काँग्रेसला विधानसभेबाबतही हूरहूर लागली आहे. यवतमाळात राष्टÑवादीने दावा सांगितला असला तरी विद्यमान आमदारासह अनेकांनी काँग्रेसमधून मोर्चेबांधणी चालविली आहे. एक माजी आमदार अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. याशिवाय अनेक चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. वणीमध्येही काँग्रेसला विधानसभा सोपी नाही. राष्टÑवादी, सेना, मनसे आणि मराठा फॅक्टर तेथे प्रभावी ठरू शकतो. वणीमध्येही काँग्रेसचा आमदार असताना लोकसभेत भाजपा उमेदवाराला ५३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. येथेही मतदारांचा कौल स्पष्ट आहे. यवतमाळात शिवसेनेला २८ हजार मतांची आघाडी मिळाली. एकूणच काँग्रेसच्या विरोधात वातावरण पाहता विद्यमान आमदारांची चिंता वाढली आहे. शिवसेनेला २७ हजार मतांची आघाडी देणार्या राळेगाव मतदारसंघात युतीकडे सक्षम उमेदवार सध्या तरी नाही. उमरखेडमध्ये दीड हजार मतांची काँग्रेसला आघाडी मिळाली असली तरी मुळात विद्यमान आमदाराबाबत उमरखेड शहरातच प्रचंड नाराजी आहे. त्याचा अनुभव लोकसभेत राजीव सातव आणि त्यांच्या प्रचारासाठी झटणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळेच उमरखेडमध्ये काँग्रेसच्या गोटातूनच यावेळी ‘चेंज’ची जोरदार मागणी पुढे येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)