दारव्हा येथे काँग्रेसचा मोर्चा
By Admin | Updated: December 22, 2016 00:14 IST2016-12-22T00:14:38+5:302016-12-22T00:14:38+5:30
शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दारव्हा येथे काँग्रेसचा मोर्चा
दारव्हा : शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून निघालेला मोर्चा तहसीलवर पोहोचल्यानंतर याठिकाणी सभा घेण्यात आली.
मोर्चात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, पक्षाचे निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, मनमोहनसिंह चव्हाण, पंढरीनाथ सिंहे, माजी नगराध्यक्ष सैयद फारूक, अशोक चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, महिला काँग्रेसच्या विजया सांगळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
आजच्या घडीला जनसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडवायच्या सोडून सरकार नाही ते प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. प्रसंगी संजय देशमुख, श्याम उमाळकर, देवानंद पवार, विजया सांगळे, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरीनाथ सिंहे आदींची भाषणे झाली. नोटबंदी, मायक्रो फायनान्स, शासनाचे शेतकरी विरोधी धोरण, जनधन योजना यासह विविध विषयांचा आपल्या भाषणात उल्लेख करून केंद्र व राज्य शासनावर टीकेची झोड उठविली.
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, उद्योजकांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, संपूर्ण कार्डधारकांना रेशनचा पुरवठा व्हावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, गरजूंना घरकुले द्यावी, महिला बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ व्हावे, श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाढवून मिळावे आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात केला आहे. (तालुका प्रतिनिधी)