काँग्रेसची सत्ता गेली पण गटबाजी कायम
By Admin | Updated: August 11, 2015 02:44 IST2015-08-11T02:44:05+5:302015-08-11T02:44:05+5:30
गटबाजी, हेवेदावे, पाय ओढणे, एकमेकांना उघडे पाडणे अशा प्रवृत्तीमुळे राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. मात्र

काँग्रेसची सत्ता गेली पण गटबाजी कायम
यवतमाळ : गटबाजी, हेवेदावे, पाय ओढणे, एकमेकांना उघडे पाडणे अशा प्रवृत्तीमुळे राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. मात्र त्यानंतरही काँग्रेस नेत्यांच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही. त्यांच्यातील गटबाजी कायम असल्याचे ‘रुमणे मोर्चा’ने सिध्द केले.
काँग्रेसच्यावतीने १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रुमणे मोर्चा आयोजित केला गेला होता. या मोर्चाची व्यापक प्रसिद्ध झाली होती. सर्वांना मोबाईलवर संदेश पाठविले. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा काँग्रेसचा मोर्चा भव्य-दिव्य निघेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र ‘फ्लॉश शो’ ठरला.
या मोर्चाकडे शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, विजयराव खडसे, वामनराव कासावार या प्रमुख माजी आमदारांनी पाठ फिरविली. हीच अवस्था पक्षाच्या व जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांची होती. त्यांनीसुद्धा या मोर्चाकडे पाठ फिरविली. अखेर लिमिटेड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणिकराव ठाकरेंनी या मोर्चाला संबोधित केले. काँग्रेसचा गेल्या कित्येक वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा निघणार असल्याने तो भला मोठा राहील, असे समजून जिल्हा कचेरीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या दृष्टीने हा रूमणे मोर्चा फुसका बार ठरला. माणिकराव ठाकरे व राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे तर जिल्ह्यातील अन्य काँग्रेस नेत्यांनी या मोर्चावर अघोषित बहिष्कार घातला नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारणे काहीही असो, मात्र काँग्रेसमधील गटबाजी अद्याप कायम असल्याचे या मोचाने सिध्द केले. पक्षातील हेवेदावे त्यांच्यासाठी शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा अधिक महत्वपूर्ण ठरत असल्याचे दिसून येते.
खुद्द माणिकराव ठाकरे उपस्थित असताना काँग्रेसचा रूमणे मोर्चा फ्लॉप ठरल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी आता वेगवेगळी कारणे पुढे करून स्व:ताचा बचाव करणे सुरू केले आहे. मुळात हा काँग्रेसचा मोर्चा नव्हताच, त्या पदाधिकाऱ्याने केवळ यवतमाळ तालुक्यापुरते या मोर्चाचे आयोजन केले होते, ती प्रेसनोट चुकून काँग्रेसचा मोर्चा म्हणून काढली गेली, अशा सबबी सांगत ठाकरे समर्थकांनी आपली इभ्रत वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या फ्लॉप शोसाठी त्या अल्पसंख्यक पदाधिकाऱ्याला आता दोष दिला जात आहे.
हा रूमणे मोर्चा नेमका जिल्हा काँग्रेसचा, युवक काँग्रेसचा तसेच जिल्ह्याचा की यवतमाळ तालुक्याचा हा संभ्रम कायम आहे. मोर्चा तालुक्यापुरता मर्यादित असेल तर त्यात जिल्ह्याच्या टोकावरील नेते मंडळी उपस्थित कशी आणि मार्गदर्शनासाठी थेट माणिकराव ठाकरे प्रकटले कसे हा प्रश्न आहे.
प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव साध्या तालुक्याच्या मोर्चाला (निवडणुकीचा काळ नसताना) संबोधित करण्यासाठी येत असतील तर पक्षातील त्यांच्या वजनाबाबत न बोललेलेच बरे. (जिल्हा प्रतिनिधी)