बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धामुळे संभ्रम
By Admin | Updated: May 24, 2014 00:13 IST2014-05-24T00:13:48+5:302014-05-24T00:13:48+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे,

बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धामुळे संभ्रम
यवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचा प्रकार जाहिरातीच्या माध्यमातून होत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप आणि रबी या दोनही हंगामात जबरदस्त नैसर्गिक तडाखा बसला आहे. पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकर्यांना मिळालेली नाही. पिक विम्यादाखल लाखो रुपये शेतकर्यांनी बँकांमध्ये जमा केले. जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना व खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही ही रक्कम मात्र शेतकर्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. अशातच शेतकर्यांना भुलविण्यासाठी विविध कंपन्यांनी आपले बियाणे शेतकर्यांच्या माथी मारण्यासाठी प्रचार तंत्राचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा प्रचंड तुटवडा पडल्यामुळे बियाण्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस सतत सुरू होता. यामुळे सोयाबीनचे बियाणे पूर्णत: खराब झाले. आता सोयाबीन तुटवड्याच्या नावाखाली बियाण्याच्या किमती वाढविण्यात आल्या आहे. या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर प्रश्नचिन्ह लागले असताना बियाणे कंपन्या मात्र आपले बियाणे कसे श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक स्थळावर भरघोस उत्पादनाचे दावे करणारे पत्रक चिकटविण्यात आले आहे. काही कंपन्यांनी गावोगाव जाऊन पथनाट्य सादर करण्याचा फंडा वापरला आहे. काही बियाणे कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना हाताशी धरून शेतकर्यांना आकृष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्त्याच्या कडेवर असलेल्या झाडांवरही विविध फलके लावण्यात आली आहे. यातून शेतकर्यांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. कृषी विभागाने या संदर्भात भरारी पथकांची निर्मिती केली असली तरी एकदा शेतात पेरलेले बियाणे उगवण शक्तीत कमी पडले तर शेतकर्याचे समोरचे नियोजन पूर्णत: कोलमडून जाते. बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता शेतकर्यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. मात्र यंंदा सोयाबीन पिकाची झालेली दुर्दशा लक्षात घेता कुठल्याच शेतकर्याकडे सोयाबीन शिल्लक असण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृषी विभागाने दिलेले सल्ले किती निराधार आहे, हे सिद्ध होते. बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धात शेतकर्यांच्या होणार्या संंभाव्य फसवणुकीबाबत शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधी दक्ष असल्याचे दिसून येत नाही. विदर्भात येणारे सोयाबीनचे बियाणे बुलढाणा जिल्ह््यात सील करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)