अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 00:10 IST2015-06-29T00:10:40+5:302015-06-29T00:10:40+5:30
देशभरात दरवर्षी अनाथालयातून १८ वर्षावरील एक लाख मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांचे पुढे काय होते याची कुठलीही नोंद होत नाही.

अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी संघर्ष
शंकरबाबा पापळकर : १२३ मतिमंद, मूकबधिरांचा बाप, पुरस्कारही नाकारले
काशीनाथ लाहोरे यवतमाळ
देशभरात दरवर्षी अनाथालयातून १८ वर्षावरील एक लाख मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांचे पुढे काय होते याची कुठलीही नोंद होत नाही. जोपर्यंत देशातील १८ वर्षावरील बेवारस आणि अपंगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा होत नाही तोपर्यंत आपण कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही. या अनाथांसाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करू असे अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील १२३ अनाथांचे वडील असलेले ज्येष्ठ सेवाकर्मी शंकरबाबा पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शंकरबाबा पापळकर यांची सातवी कन्या लाजवंती हिचा साक्षगंध कार्यक्रम यवतमाळ येथे रविवारी आयोजित असून यासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते. भारतात अपंगांचा सांभाळ करणाऱ्या हजारो संस्था आहेत. मात्र अपंगांचे पुनर्वसन करणारी शंकरबाबांची वझ्झर येथील देशातील एकमेव संस्था आहे. २५ वर्षापूर्वी बाबांनी मानवसेवेचा विडा उचलला आज वयाची ७६ वी सुरू असताना १२३ मुलांना त्यांनी आपले नाव दिले. १७ मुलींचे लग्न लावून दिले. १२ मुलांना नोकरी मिळवून दिली.
दरमहा येतो एक लाखांचा किराणा
अंध, निराधार, अपंग आदींचा सांभाळ करणाऱ्या शंकरबाबांच्या संस्थेत दरमहा अमरावतीचे प्रभाकरराव वैद्य एक लाख रुपयापर्यंतचा किराणा न चुकता पाठवितात. यासोबतच अनेक दानशुरांचे सहकार्य मिळत असल्यानेच शासनाच्या अनुदानाशिवाय हे बालगृह स्वाभिमानाने सुरू असल्याचे शंकरबाबा सांगतात. मतिमंद, मूकबधीर बालगृहांचा तीन कोटींचा ट्रस्ट आहे. यात बाबांच्या कोणत्याही नातेवाईकांचा समावेश नाही. संस्थेतील अंध मुलगा विदूरला बाबांनी सर्वाधिकार दिले असून तोच संस्थेचा उत्तराधिकारी असणार आहे.