निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच

By Admin | Updated: May 30, 2015 02:33 IST2015-05-30T02:33:45+5:302015-05-30T02:33:45+5:30

येथील तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच आहे. तहसीलच्या भोंगळ कारभाराने या निराधारांचे कित्येक वर्षांपासूनचे अर्ज गहाळ झाले.

The condition of old and old is still going on | निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच

निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच

दोषी मोकाटच : पाच महिन्यांपासून छदामही नाही, तहसीलमधून कागदपत्रे झाली गहाळ, वृद्ध मारतात दररोज तहसीलचे हेलपाटे
मारेगाव : येथील तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच आहे. तहसीलच्या भोंगळ कारभाराने या निराधारांचे कित्येक वर्षांपासूनचे अर्ज गहाळ झाले. परिणामी गेल्या पाच महिन्यांपासून ७६० निराधार, वृद्ध लाभार्थ्यांना छदामही मिळाला नाही. तथापि त्यांचे गर्ज गहाळ होण्यास कारणीभूत ठरलेले संबंधित कर्मचारी अद्याप मोकाटच आहेत. नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेण्याची गरज आहे.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभाग आहे. त्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने निराधार, वृद्धांचे अनुदान अर्ज व कार्यालयातील दप्तरच पाच महिन्यांपासून गहाळ झाले. मात्र कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ होऊन अथवा चोरी जाऊही त्याबाबत साधी पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. तथापि अर्ज गहाळ झाल्याने विविध योजनाअंतर्गत अनुदानाचा लाभ घेणारे ७६० निराधार लाभार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून छदामही मिळाला नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. हे निराधार, वृद्ध प्रचंड आक्रोश करीत आहे. मात्र त्यांचा आवाज कुणालाच ऐकू जात नाही.
शासनाने निराधार, वृद्धांना आधार देण्यासाठी सन १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू केली. त्यात वेळोवेळी सुधारणा झाली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवत्तीवेतन योजना गट ‘अ’ आणि गट ‘ब’, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनांतर्गत या निराधार, वृद्धांना अनुदान देण्यात येते. या योजनांचे तालुक्यात दोन हजारांच्यावर लाभार्थी आहेत. दरमहा प्रत्येकी ६०० रूपयांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते. मात्र सतत बदलते कर्मचारी, प्रभारी अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने येथील कामात अनियमितता आली. संबंधित कर्मचारी बेपर्वा असल्याने संगणकीय याद्यांतून अनेकांची नावे सुटू लागली. मृतक लाभार्थ्यांच्या नावाने अनुदान पाठविले जाऊ लागले. एकूणच मनमानी कारभारामुळे येथील हा विभाग आता प्रचंड चचेचा विषय ठरला आहे. सहा महिन्यांपूर्वी विभागात लाभार्थ्यांचे अर्ज क्रमवार लावणे, रेकार्ड अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी तब्बल ७६० निराधार, वृद्धांचे अर्ज गहाळ झाल्याचे दिसून आले. मात्र तरीही संबंधित कर्मचारी बिनधास्त होते. तथापि लाभार्थी मात्र हवालदिल झाले. कारण जानेवारी २०१५ पासून त्यांचे अनुदानच बंद झाले. तत्पूर्वी आॅक्टोबर २०१४ पासून काही लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. तरीही अधिकारी, कर्मचारी लाभार्थ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. सदर प्रतिनिधीने या बीबंचा पाठपुरावा केला. त्यानंतर कुठे अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसाठी मडळनिहाय शिबिरे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही शिबिरे आता घेण्यात आली. मात्र त्यांची प्रकरणे तयार करण्यासाठी आणखी किमान एक ते दीड महिनयांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत उन्हामुळे काही लाभार्थी कदाचित शेवटचा श्वास घेतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या योजनेचे जिल्हास्तरीय संनियंत्रण अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आहे. त्यांनीही या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे वृद्ध व निराधार लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The condition of old and old is still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.