पालकमंत्र्यांचे अपयश झाकण्यासाठी सेनेचा बंद
By Admin | Updated: June 29, 2016 02:28 IST2016-06-29T02:28:38+5:302016-06-29T02:28:38+5:30
जिल्ह्यासह शहरात सातत्याने दरोडा, बलात्कार, खून, गँगवॉर यासारख्या घटना होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालकमंत्र्यांचे अपयश झाकण्यासाठी सेनेचा बंद
पत्रपरिषद : शहर काँग्रेसचा आरोप, सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही
यवतमाळ : जिल्ह्यासह शहरात सातत्याने दरोडा, बलात्कार, खून, गँगवॉर यासारख्या घटना होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पालकमंत्री संजय राठोड याला सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांचे अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी शिवसैनिकांनीच यवतमाळ बंद पुकारला, असा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत केला.
जिल्ह्यात खासदार आणि पालकमंत्री हे दोन्ही शिवसेनेचे आहेत. प्रशासनावर वचक बसविण्यात दोघेही अपयशी झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. निष्क्रिय आणि क्षमता नसलेले लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर काय होते, याचा अनुभव जिल्ह्यातील जनता घेत आहे. पालकमंत्र्याच्या पक्षातीलच पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन पुकरावे लागत असेल तर पालकमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
जनआंदोलनाच्या नावाखाली शिवसेनाच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. महागाव येथे आमदारांच्या घरावर गेलेल्या सर्व पक्षीय मोर्चातील शिवसैनिकांनीच आतातायीपणा दाखविला. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला. सत्ताधारीच आंदोलन करत असल्याने एक विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे. उद्या पालकमंत्री अधिकारी ऐकत नाही म्हणून उपोषणाला बसले तर कुणला नवल वाटू नये, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला. काँग्रेसच्या या भूमिकेचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला.
या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे निरिक्षक श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री संजय देशमुख आदी उपस्थित असल्याचे पवार यांनी सांगितले. शेतकरी आणि जनता अडचणीत असताना सत्ताधारी शिवसैनिक नौटंकी करत आहे. अधिकार असूनही निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांची बदलीच का करत नाही, असाही प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेला मुळात जनाधार गमावल्याची भीती आहे, त्यामुळेच मंगळवार हा बाजारपेठ बंदचा दिवस पाहूनच शहर बंदची हाक दिली. इतर कुठल्याही दिवशी बंद पुकारला असता तर त्याचा फज्जा उडाला असता. त्यामुळे मंगळवार दिवस निवडण्यात आला, असा आरोप देवानंद पवार यांनी केला.
या पत्रपरिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, घनश्याम अत्रे, सिकंदर शहा, अरुण ठाकुर, उमेश इंगळे, प्रदीप डंभारे, नितीन मिर्झापुरे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)