बियाणे काळाबाजार, अवैधधंदे बंद करा
By Admin | Updated: June 17, 2016 02:44 IST2016-06-17T02:44:49+5:302016-06-17T02:44:49+5:30
तालुक्यामध्ये होत असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार ताबडतोब थांबवा, अवैधधंदे व जुगारांच्या मुसक्या आवळा, प्रामाणिकपणे आरोग्य सेवा द्या,...

बियाणे काळाबाजार, अवैधधंदे बंद करा
गृहराज्यमंत्र्यांचे आदेश : कळंबच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती
कळंब : तालुक्यामध्ये होत असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार ताबडतोब थांबवा, अवैधधंदे व जुगारांच्या मुसक्या आवळा, प्रामाणिकपणे आरोग्य सेवा द्या, कृषींशी संबधित योजना शेतकऱ्यांपर्यंत ताबडतोब पोहचवा असे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.
गुरुवारी येथील पंचायत समिती सभागृहात ना. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, सभापती वर्षा वासेकर, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते. ना. पाटील यांनी यावेळी पीक कर्ज वाटप, कर्ज पुनर्गठन, बियाणे-खते-किटकनाशकांची विक्री, काळाबाजार, बंधाऱ्यांची निकृष्ट कामे अशा विविध विषयांवर आढावा घेऊन गैरप्रकार रोखण्याचे आदेश दिले. कृषी मालाचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक दुकानावर कोतवालाची ड्युटी लावण्यात यावी. शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे अहवाल तात्काळ देण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
थेट एसपींना आदेश
कळंब परीसरात मोठ्या प्रमाणात लुटमारीचे प्रकार सुरु आहेत. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अवैध धंद्याचे प्रकारही खुलेआम सुरु आहे. त्यामुळे डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याशी तात्काळ संपर्क साधून हा प्रकार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निलीमा गोहणे, उपसभापती विजय गेडाम, पंचायत समिती सदस्य विजय सुटे, किरण पवार, तिलोत्तमा मडावी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अमोल ढोणे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, उपाध्यक्ष सुदाम पवार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आमदारांची हतबलता
राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके यांची हतबलता आज आढावा बैठकीत उघड झाली. कळंब तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार, बंधाऱ्यांची कामे निकृष्ट होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. त्यावर त्यांनी या कामांच्या चौकशीचे आदेश दिले.