जिल्ह्यातील १२०७ संग्राम केंद्र बंद
By Admin | Updated: July 2, 2016 02:32 IST2016-07-02T02:32:58+5:302016-07-02T02:32:58+5:30
ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी आणि विविध संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाभरात सुरू करण्यात आलेले १२०७ संग्राम केंद्र

जिल्ह्यातील १२०७ संग्राम केंद्र बंद
आर्थिक तरतूदच नाही : आॅनलाईन प्रमाणपत्रांसाठी धावाधाव
रूपेश उत्तरवार यवतमाळ
ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी आणि विविध संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाभरात सुरू करण्यात आलेले १२०७ संग्राम केंद्र निधी तरतूदीअभावी सध्या बंद पडले आहेत. याचा थेट परिणाम ग्रामपंचायतीच्या व्यवहारावर झाला असून, नागरिकांना आॅनलाईन प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचातीचा व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संग्राम केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. याठिकाणाहून १९ प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच संपूर्ण व्यवहारावरही नियंत्रण ठेवले जाते. यासाठी १३ व्या वित्त आयोगातून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. मात्र आता १४ वा वित्त आयोग जाहीर होताच ही तरतूद बंद करण्यात आली. परिणामी संग्रामकेंद्र बंद पडले. परिणामी नागरिकांना विविध प्रमाणपत्रासाठी आता तालुका अथवा जिल्ह्याचे स्थळ गाठावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या व्यवहारावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे.
संग्रामकेंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर संपूर्ण कामकाज पारदर्शक करण्यात आले होते. संग्राम केंद्रांच्या माध्यमातून दररोजचा हिशेब ग्रामविकास विभागापर्यंत पोहोचविल्या जात होता. ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे आॅनलाईन आॅडीट यामुळे सरकार दरबारी जमा होत होते. प्रत्येक पैशाचा हिशेब लागत होता. यातून गैरप्रकारालाही आळा बसला होता. यासोबतच जन्म-मृत्यू, विवाह प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, घरटॅक्स आणि पाणीकर वसुलीची पावती संगणकावर उपलब्ध करून दिली जात होती. सदर काम संग्राम केंद्रातील आॅपरेटर दररोज अपडेट करीत होते.
मात्र संग्राम केंद्राच्या निधीसाठी १४ व्या वित्त आयोगात आर्थिक तरतूदच झाली नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात करार संपताच संग्राम केंद्र बंद पडले आहे. काही आॅपरेटरांना तर सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. आॅनलाईन कामकाजाकरिता असलेले संगणक आॅपरेटरअभावी ठप्प झाले आहे. नागरिकांना दाखल्यासाठी आता तालुका अथवा जिल्हास्थळ गाठावे लागत आहे.
संग्राम-२ ची घोषणा हवेतच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत ३० एप्रिलपर्यंत संग्राम टू सुरू करण्याची घोषणा केली होती. संग्राम चालकांना तसे आश्वासनही दिले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी संग्राम केंद्र नव्याने सुरू झाले नाही. त्यामुळे आपरेटर संकटात सापडले आहे. आता ग्रामविकास विभाग यावर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.