सांडपाण्यामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना
By Admin | Updated: October 8, 2014 23:33 IST2014-10-08T23:33:53+5:302014-10-08T23:33:53+5:30
सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात

सांडपाण्यामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना
यवतमाळ : सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीमुळे होणारा त्रास असह्य आहे. प्रामुख्याने लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सदनिकांविषयी हा प्रश्न गंभीर आहे.
सदर ग्रामपंचायत क्षेत्रात दारव्हा मार्गावर असलेल्या अनेक सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. विशेषत: एकवीरा चौकानजीकच्या सदनिका नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले आहे. मातोश्री नगराला लागून असलेल्या सदनिकेतील पाण्यामुळे तर मोठी गटारगंगा तयार झाली आहे. याठिकाणी दोन महिन्यांआधी मुरमाचे ढीग टाकून पाणी वाहने तेवढे थोपविले. आता मात्र त्या ठिकाणी तलावसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
राऊतनगरात असलेल्या सदनिकेचे सांडपाणी दारव्हा मार्गाकडे जाणाऱ्या रुळालगत सोडून देण्यात आले. नागरी वस्ती असलेल्या भागात हे पाणी थोपले गेले. यापाण्यामध्ये जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो. शिवाय महावीरनगरच्या बाजूला असलेल्या काही सदनिकांच्या पाण्यानेही यामध्ये भर पडली आहे. पावसाळ्यात तर डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून सांडपाणी वाहून जात असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र जलस्रोत दूषित होतात. यापासून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
अलीकडेच दारव्हा मार्गावर निर्माण झालेल्या एका सदनिकेलगत जुन्या सदनिकेतील सांडपाण्याचे भलेमोठे डबके तयार झाले आहे. केवळ मुरूम टाकून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून पाणी वाहते. या मार्गावरून वाहतुकीचे प्रमाण कमी असले तरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना मात्र नाकाला रूमाल लावून ये-जा करावी लागते. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही लोहारा ग्रामपंचायतीला मात्र याविषयी काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. (वार्ताहर)