मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त

By Admin | Updated: May 24, 2015 00:07 IST2015-05-24T00:07:33+5:302015-05-24T00:07:33+5:30

रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या ...

Citizen stricken with slaughter animals | मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त

मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त

अपघाताची भीती : बंदोबस्तासाठी पुढाकारच नाही
उमरखेड : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी टक्कर खेळणारी मोकाट जनावरे उमरखेड शहरात नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त मात्र करण्यास कुणीही पुढे येत नाही.
उमरखेड शहराच्या मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही जनावर दिसले की, काढता पाय घेतात. येथील नांदेड, ढाणकी, महागाव आणि पुसद रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाही. बसस्थानक परिसर, विश्रामगृह, तहसील, पंचायत समिती या भागात नागरिकांची दररोज गर्दी असते. त्याठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीती असते.
मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी जनावर भाजीपाल्यावर ताव मारतात. ग्राहकांच्या हातातील पिशव्यातही तोंड घालायला जनावरे मागे पाहत नाही. अनेकदा या जनावरांच्या टकरीही सुरू असतात. ऐन गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या टकरींमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जीवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते.
हा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु नगरपरिषद या जनावरांना कोंडवाड्यात टाकत नाही. जनावर मालकांचाही शोध घेतला जात नाही. आज शेकडो जनावरे उमरखेडच्या रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. (शहर वार्ताहर)
जनावरांच्या टकरींमुळे नागरिकांची त्रेधा
उमरखेड शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या अनेकदा टकरी सुरू असतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. जनावरांच्या टकरींमुळे अनेकदा नागरिक आणि वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. वर्दळीच्या मार्गावर या जनावरांच्या टकरीत सापडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडतात. मात्र या जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यांच्या मालकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Citizen stricken with slaughter animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.