ग्रामसेवकाच्या मृत्युचा तपास ‘सीआयडी’कडे
By Admin | Updated: September 10, 2014 23:59 IST2014-09-10T23:59:32+5:302014-09-10T23:59:32+5:30
घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी

ग्रामसेवकाच्या मृत्युचा तपास ‘सीआयडी’कडे
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
अमोल रामभाऊ चांदेकर (३१) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. तो घाटंजी पंचायत समिती अंतर्गत मांडवा येथे कार्यरत होता. दरम्यान शासनाच्या योजनेतून शेतकरी लाभार्थ्याची तयार झालेली विहिर मोजण्यासाठी गेला असताना २२ मार्च २०१२ ला त्याचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत स्थानिक नागरिकांना विहिरीत आढळून आले होते. अमोलच्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मारहाणीच्या खुना आढळून आल्या होत्या. त्यावर अमोलचा विहिरीत पडून मृत्यू नव्हे तर खुन झाल्याचा आरोप त्याचे वडील रामभाऊ हरीभाऊ चांदेकर यांनी केला होता. मात्र घाटंजी पोलिसांनी याप्रकरणात अकस्मात घटनेची नोंद घेतली. रामभाऊ चांदेकर यांच्या तक्रारीवरून गावातीलच चार संशयितांची चौकशी पोलिसांनी केली. मात्र पुरावे न आढळल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. तपास गुंडाळल्या गेल्याने अखेर रामभाऊ चांदेकर यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच याचिका दाखल करून याप्रकरणाचा पुन्हा तपास केला जावा. हा तपास सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) कडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने हा तपास सीआयडीकडे सोपविण्याचे आदेश दिले. नुकताच यासंबंधीचा आदेश यवतमाळ येथील सीआयडी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यांनी तपासाची डायरी ताब्यात घेऊन बुधवारी अमरावतीला तपासणीसाठी पाठविली. (स्थानिक प्रतिनिधी)