जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता तपासा

By Admin | Updated: August 5, 2015 00:06 IST2015-08-05T00:06:01+5:302015-08-05T00:06:01+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वच गावांमध्ये कामे होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ज्या गावांमध्ये कामे होऊ शकली नाही,

Check the quality of the water tank | जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता तपासा

जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता तपासा

संजय राठोड : उर्वरित गावांतील कामांचे चांगले नियोजन करा, आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले निर्देश
यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वच गावांमध्ये कामे होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ज्या गावांमध्ये कामे होऊ शकली नाही, त्या गावांमध्ये प्राधान्याने कामे घेण्यासोबतच कामांचे चांगले नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत झालेली कामे व होणाऱ्या कामांचा आढावा घेतला. तसेच समाधान शिबिरा अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह कृषी, जलसंपदा, बांधकाम, लघुसिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, पाणीपुरवठा, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध यंत्रणांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. आतापर्यंत ३०२ गावांमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त कामे झाली असल्याचे सांगण्यात आले. काही गावांमध्ये कामे होऊ शकली नाही, अशा गावांसह ३१३ गावांमध्ये करावयाच्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना केल्या.
जलयुक्तमधून झालेल्या कामांची तपासणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून करून घेण्यात येत आहे. त्यानंतर जलसंपदा, बांधकाम, लघूसिंचनच्या अधिकाऱ्यांकडून कामांचे क्रॉस चेकिंग करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. अभियानातून होणारी कामे गुणवत्तापूर्वकच असली पाहिजे. अभियानात जिल्ह्यात चांगले काम व्हावे आणि राज्यभर जिल्ह्यातील कामांचे कौतुक व्हावे, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात ४१३ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात अभियानातून कामे घेण्यात येत आहे. या गावांमध्ये जुने एक हजारांवर सिमेंट नाला बंधारे आहे. नवीन बंधारे घेण्यापेक्षा या बंधाऱ्यातील गाळ काढून नाला खोलीकरणाच्या कामास प्राधान्य देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. यावेळी त्यांनी यंत्रणानिहाय कामांची माहिती घेतली. (प्रतिनिधी)
समाधान शिबिरातील प्रकरणांचा निपटारा
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विभागस्तरावर घेतलेल्या समाधान शिबिरातील प्रकरणांचा आढावा घेतला. शिबिरातील प्रकरणे प्रलंबित असल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करा. प्रकरणे निकाली निघणे शक्य नसल्यास तसे संबंधितांना कळविण्याचे निर्देश त्यांनी दिले. आॅगस्टअखेरपर्यंत प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सांगितले.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडू नका
जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शासनाची विविध कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व विभागांच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यास, नवीन अधिकारी येईपर्यंत बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडू नका, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Check the quality of the water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.