शेतकऱ्यांची मुले बनणार सनदी अधिकारी
By Admin | Updated: July 1, 2016 02:36 IST2016-07-01T02:36:15+5:302016-07-01T02:36:15+5:30
यशाची शिखरे गाठण्याची धडपड करणरी शेतकरी कुटुंबातील पाल्यांना मदत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची मुले बनणार सनदी अधिकारी
बळीराजा चेतना अभियान : तीन शेतकरी पुत्रांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मदत
यवतमाळ : यशाची शिखरे गाठण्याची धडपड करणरी शेतकरी कुटुंबातील पाल्यांना मदत करण्यात येत आहे. बळीराजा चेतना अभियान आणि जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमातून तीन शेतकरी पुत्रांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अभियानास मिळालेल्या निधीतून ही मदत करण्यात आली आहे. या शेतकरी पुत्रांना जिल्हाधिकारी सिंह, एसली अखिलेशकुमार सिंग यांनी पाल्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील जे पाल्य परीक्षेची तयारी करीत आहेत, ज्यांनी एखाद्या परिक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली असून मुख्य परीक्षा किंवा मुलाखत देण्यास काही आर्थिक अडचणी आहे. अशा तालुक्यातील दोन शेतकरी पाल्यांना बळीराजा चेतना अभियान आणि जिल्हा पोलिस प्रशासन अंतर्गत स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मदत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला होता. त्यानुसार पुसद तालुक्यातील गोविंदनगर (काकडदाती) येथील सुशील रामकृष्ण पेंटेवाड यांना पाच हजारांची मदत करण्यात आली. सुशिल पेंटेवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. पुसद तालुक्यातील लक्ष्मीनगर बोरगडी येथील कृतिका वसंतराव गायकवाड हिने महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नेर तालुक्यातील गोपाल पुडंलिक घुघाने याने विक्रीकर निरीक्षक या पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना पुढील परीक्षा देण्यास आर्थिक अडचण येऊ नये यासाठी प्रत्येकी पाच हजारांची मदत बळीराजा चेतना अभियान समितीच्या लोकसहभाग निधीतून देण्यात येणार आहे.
शेतकरी कुटुंबातील शेतकरी पाल्यांनी एखादी स्पर्धा परीक्षा देऊन त्या स्पर्धा परिक्षेमध्ये प्रतिक्षाधीन म्हणून असेल व उमेदवाराची निवड झाली नसेल. तसेच अधिक तयारी करण्याकरिता उमेदवाराला काही आर्थिक अडचण असेल, अशाही शेतकरी पाल्यांनी यासाठी संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात आतापर्यंत पूर्व परीक्षेत मिळवलेले यश व यापूर्वीच्या परिक्षांच्या निकालाची प्रत आदी कागपत्रासह प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)