नव्या आरएफओंपुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान
By Admin | Updated: August 31, 2014 00:06 IST2014-08-31T00:06:48+5:302014-08-31T00:06:48+5:30
हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर आणि अर्जूना बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. त्यानंतर ट्रक फसल्याने तस्करीचा प्रयत्न फसला. याची गंभीर दखल घेत हिवरी वनपरिक्षेत्र

नव्या आरएफओंपुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान
शिवानंद लोहिया - हिवरी
हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर आणि अर्जूना बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. त्यानंतर ट्रक फसल्याने तस्करीचा प्रयत्न फसला. याची गंभीर दखल घेत हिवरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागेवर नवे आरएफओ रुजू झाले. मात्र तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. विशेष असे की वन कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही तस्करांची दहशत कायम आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर बीटमधील राखीव वनातील कक्ष क्र.४९७ मध्ये तस्करांनी शेकडो सागवान वृक्षाची कत्तल केली. तसेच ट्रकद्वारे या लाकूडसाठ्याची तस्करीही झाली. ही तस्करी एका क्षेत्र सहाय्यकाच्या लक्षात येताच त्याने हिवरीचे तत्कालिन वन परिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहिते यांना घटनेची माहिती दिली. मात्र कारवाईच्या भीतीने त्यांनी हा प्रकार तब्बल १५ दिवस दडवून ठेवला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांच्या मदतीने ही सागवान तस्करी उजेडात आणली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच मनपूर बीटमधून सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठा वाहून नेत असताना ट्रक फसला. त्यामुळे तस्करांनी कारवाईच्या भीतीने तेथून पळ काढला. दरम्यान ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. तेव्हा आरएफओ मोहिते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गस्तीदरम्यान ट्रकचा पाठलाग करून तस्करांना गजाआड करण्याचा प्रयत्न केल्याचे वरिष्ठांना सांगितले. मात्र त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. घटनेचा खुलासाही ते समाधानकारकरित्या सादर करू शकले नाही. याची गंभीर दखल घेत यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी आरएफओ मोहिते यांच्या निलंबनाची शिफारस केली. प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून मंजुरात मिळताच आरएफओ मोहिते यांच्यासह क्षेत्रसहाय्यक, दोन वनरक्षक आणि एक चौकीदार अशा एकूण पाच जणांना निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर त्यांनी वरिष्ठांची मनधरणी करून निलंबन परत घेण्याची गळ घातली. त्यासाठी एका दलालामार्फत प्रयत्नही झाले. मात्र मुख्य वनसंरक्षक गुरमे यांनी त्यांच्या या हालचालींना फारसे गांभीर्याने घेतले नाही. आता नवे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.व्ही. वानखडे रुजू झाले आहे. त्यांच्यापुढे यापूर्वी झालेल्या सागवान कत्तल आणि तस्करीत सहभागी मुख्य सूत्रधाराला व त्याच्या साथीदारांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.