तंटामुक्त गावांपुढे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाचे आव्हान
By Admin | Updated: August 26, 2014 00:16 IST2014-08-26T00:16:15+5:302014-08-26T00:16:15+5:30
गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडे गावात शांतता राखण्याच्या

तंटामुक्त गावांपुढे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाचे आव्हान
पुसद : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडे गावात शांतता राखण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविणे महत्वाचे आहे. गावागावात स्थापन झालेल्या तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेतल्यास एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गत सात वर्षात या मोहिमेला मोठे यशही मिळत आहे. गावातील तंटे गावात मिटवून शांतता व सुव्यवस्था निर्माण होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा ताण असतो. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. एका गावात एकच गणपती स्थापन केल्यास गावातील शांतता भंग होणार नाही. पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळ स्थापन केले जातात. गावागावात एकापेक्षा अधिक गणेश मंडळाची स्थापना होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
गावात एकच गणपती असेल तर गटबाजी निर्माण होणार नाही, वाद-विवाद टाळले जातील. गावाची शांतताही भंग होणार नाही. परिणामी गावाची सामाजिक, सांस्कृतिक ओळख निर्माण होईल, यासाठी एक गाव एक गणपती यावर भर देण्याची गरज आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही लोकचळवळ आहे. या चळवळीची धुरा खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांना गावात तंटामुक्तीसाठी उपाय करावयाचे आहे. त्यातीलच एक गाव एक गणपती हा महत्वाचा उपक्रम आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाला खंबीरपणे या तंटामुक्त समित्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. अनेक गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी आणखीन या उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या निश्चितच वाढणार आहे. तंटामुक्त गाव समिती आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रमाने गावकऱ्यांचे मतपरिवर्तन होईल, यात कुणालाही शंका नाही. (प्रतिनिधी)