काँग्रेसपुढे मते कायम राखण्याचे आव्हान
By Admin | Updated: November 18, 2016 02:31 IST2016-11-18T02:31:50+5:302016-11-18T02:31:50+5:30
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेवटच्या घटकेपर्यंत काँग्रेसला पक्षीय मते कायम राखण्याचे आव्हान राहणार आहे.

काँग्रेसपुढे मते कायम राखण्याचे आव्हान
विधान परिषद : पक्षांतर्गत गटबाजीचा धोका
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेवटच्या घटकेपर्यंत काँग्रेसला पक्षीय मते कायम राखण्याचे आव्हान राहणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीतून ऐनवेळी दगा फटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत काँग्रेसकडून कोणती रणनीती आखली जाते, हे निर्णायक ठरणारे आहे.
काँग्रेसचे शंकर बडे हे माजी मंत्री शिवाजीराव मोघे पुरस्कृत उमेदवार म्हणून चर्चिले जात आहे. पक्षातील इतर नेते मंडळी या शेवटच्या दोन दिवसांत त्यांच्यासाठी कितपत प्रयत्न करतात, यावर निवडणूक अवलंबून आहे. आजतागायत काँग्रेसमध्ये नेत्यांत असलेली अंतर्गत धुसफूस विरोधकांच्या कायम पथ्यावर पडत आली आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे असलेली १५४ मते कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजपाने प्रा. तानाजी सावंत यांच्यासारखा सक्षम उमेदवार देऊन मोठे आव्हान उभे केले आहे. सावंत यांनी आपल्या कार्यशैलीची छाप मराठवाड्यात सोडली आहे. सहकार, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यामुळे सावंत यांची दावेदारी काँग्रेससाठी तगडे आव्हान देणारी आहे. यातच संभाव्य पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपाकडून गृहराज्य मंत्री रणजित पाटील मैदानात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेसोबत आहे. इतकेच नव्हेतर, भाजपाचे राज्यमंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे युतीकडूनही तानाजींच्या विजयासाठी जोरकस प्रयत्न केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)