पारधी बांधवांना बेड्यावरच मिळाले प्रमाणपत्र
By Admin | Updated: August 10, 2015 02:15 IST2015-08-10T02:15:51+5:302015-08-10T02:15:51+5:30
महसूल दिनानिमित्त उमर विहीर येथील पारधी बेड्यावर तहसीलदार सुरेश कव्हळे व उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी दाखले वाटपाचा उपक्रम आयोजित केला.

पारधी बांधवांना बेड्यावरच मिळाले प्रमाणपत्र
१४७ दाखल्यांचे वाटप : उमर विहीरच्या बेड्यावर राळेगाव उपविभागाचा उपक्रम
राळेगाव : महसूल दिनानिमित्त उमर विहीर येथील पारधी बेड्यावर तहसीलदार सुरेश कव्हळे व उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी दाखले वाटपाचा उपक्रम आयोजित केला. या पारधी बेड्यावर १४७ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विविध दाखल्यांपासून वंचित असलेल्या पारधी बेड्यावरील मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.
निरीक्षर पारधी बांधवांच्या पाल्यांना शिक्षणासाठी कुठलाही दाखला हवा असल्यास त्यांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या मारव्या लागतात. कधी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नाही, तर कधी इतर त्रुटी सांगितल्या जातात. यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळणे कठीण बनले होते. परंतु महाराष्ट्र राज्य राजस्व अभियान अंतर्गत राळेगाव उपविभागाचा अभिनव उपक्रम सुरू झाल्याने पारधी बांधवांना प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले.
आपल्या पारधी बेड्यावर अचानक उपविभागाचे मोठे अधिकारी येतील याची पुसटशी कल्पनाही पारधी बांधवांना नव्हती परंतु महसूलदिनी सकाळी ११ वाजता अचानक उमर विहीर पारधी बेड्यावर वाहनांचा ताफा धडकला. आपल्या बेड्यावर इतके अधिकारी आल्याचे पाहताच सर्व आबालवृद्ध गोळा झाले. सर्वांना त्यांच्या भाषेत अधिकारी येण्याचे कारण पटवून देण्यात आले.
आपल्याला महत्त्वाची कागदपत्रे मिळणार हे कळताच बेड्यावरील समाज मंदिरासमोर मोठी पिवळी ताडपत्री आणल्या गेली. अधिकाऱ्यांसह संपूर्ण गावकरी एकाच ताडपत्रीवर बसले आणि राळेगाव उपविभागाचे कार्यालय उमर विहीरच्या ताडपत्रीवर सुरू झाले. जातप्रमाणपत्र, सातबारा वाचन, रेशनकार्ड इत्यादी प्रमाणपत्रे घेऊन जरी ते वाचता येत नव्हते तरी त्याच्याकडे प्रत्येक पारधी बांधव कुतुहलाने पहात होता. प्रत्येकाने प्रमाणपत्रासह फोटोही काढून घेतला. ‘सर्व प्रमाणपत्रे जपून ठेवा’ असे आवाहन यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य राजस्व अभियान ही शासनाची लोकाभिमुख व महत्त्वाकांक्षी योजना आहे. विहीत मुदतीत जनतेच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचा जलदगतीने निपटारा होणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी या अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती उपस्थित पारधी बांधवांना दिली. (प्रतिनिधी)