शतकोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच
By Admin | Updated: September 15, 2014 00:24 IST2014-09-15T00:24:43+5:302014-09-15T00:24:43+5:30
पर्यावरण समृद्धीसाठी गावागावात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. मात्र उमरखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्ष रोपणाला खो दिला. त्यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी

शतकोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच
उमरखेड (कुपटी) : पर्यावरण समृद्धीसाठी गावागावात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. मात्र उमरखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्ष रोपणाला खो दिला. त्यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचे तीनतेरा वाजले आहे. ग्रामसेवकांचेही दुर्लक्ष होत असून वृक्ष लागवडीसाठी खोदलेले खड्डेही बेपत्ता आहे. तालुक्यात ही योजना केवळ कागदावरच राबविल्याचे दिसत आहे.
वनविभागातर्फे राबविण्यात येणारी शतकोटी वृक्ष लागवड योजनतून राज्यात कोट्यवधी वृक्ष लागवड झाल्याचे शासन सांगते. परंतु उमरखेड तालुक्यातील परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शविते. ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या दुर्लक्षित धोरणामुळे ही योजना राबविलीच नसल्याचे दिसत आहे. उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला.
त्यातून वृक्ष लागवड करणे महत्वाचे होते. परंतु तसे झालेच नाही. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीसाठी शासन दरवर्षी ग्रामपंचायतींना आवश्यक निधी देते. मात्र ग्रामपंचायतीने लागवडीत विशेष कामगिरी केल्याचे दिसत नाही.
केवळ पैसा कमविणे हाच उद्देश या योजनेत असल्याचे दिसत आहे. इतर कामांची परिस्थिती वेगळी असते. काही ग्रामसेवक तर केवळ थातूरमातूर काम करून शासनाचे वेतन घेतात. बरेचवेळा मजूर कामावर गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारी जातात व १५ मिनिटे उभे राहून निघून येतात. त्यामुळे ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही. असेच शतकोटी वृक्ष लागवड योजनेचे झाले आहे. कर्मचारी कागदावरच वृक्षारोपण केल्याचे दाखवित आहे. वृक्ष रोपणच झाले नसताना संगोपनाच्या नावावरही निधी उचलल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारांची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधीही गप्प दिसत आहे. (वार्ताहर)