केंद्रीय सचिवांनी घेतली वंडलीची ग्रामसभा
By Admin | Updated: April 22, 2016 04:31 IST2016-04-22T04:31:55+5:302016-04-22T04:31:55+5:30
तालक्यातील वंडली येथे ‘ग्राम उदय ते भारत उदय’ या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे

केंद्रीय सचिवांनी घेतली वंडलीची ग्रामसभा
कळंब : तालक्यातील वंडली येथे ‘ग्राम उदय ते भारत उदय’ या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय उपसचिव एम. आय. वाडवाणी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा मांढरे होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक बी. डब्ल्यू. चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, तालुका कृषी अधिकारी के. बी. आठवले आदी उपस्थित होते. के. बी. आठवले, डॉ. मनोहर नाल्हे व पद्माकर मडावी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
यावेळी उपसचिव एम. आय. वाडवाणी यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला. तो कुठे खर्च करण्यात आला. निधी खर्च करताना गावकऱ्यांना विश्वासात घेतले जावे. गावात स्वच्छता असली पाहिजे. शौचालय बांधकाम करुन ते वापरले पाहिजे. गाव निर्मलग्राम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी संदीप अपार म्हणाले, शासनाच्या विविध योजना आहे. या योजनांची माहिती सांगणे जसे शासकीय कर्मचाऱ्यांचे काम आहे, तसे जनतेनेही जागृत असले पाहिजे. दिल्लीत बसून योजनांची आखणी करणारे अधिकारी गावपातळीवर येऊन माहिती घेत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व योजना लोकाभिमुख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर यांनी प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. संचालन प्रसेनजित पाटील यांनी केले. तर आभार पद्माकर मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला उपसरपंच नंदा पारीसे, विस्तार अधिकारी रमेश केळकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, कृषी विस्तार अधिकारी पंकज बरडे, मुख्याध्यापक गिरीधर ससनकर, ग्रामसेवक प्रवीण सदावर्ते, मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने, मंडळ अधिकारी पंचबुद्धे, श्याम कामटकर, स्मिता ढोले, तलाठी तलवारे, शिक्षक बेलखेडे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
खते, बि-बियाणांचा काळाबाजार
४शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहे, पण त्यांची माहिती दिली जात नाही. खते, बि-बियाणे चढ्या भावाने विकली जाते. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे यात शेतकरी वर्ग भरडला जातो, अशी तक्रार काही युवा शेतकऱ्यांनी उपसचिवांपुढे केली. यावर त्यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.