शतकोटीचा हिशेब जुळेना
By Admin | Updated: June 8, 2015 00:13 IST2015-06-08T00:13:43+5:302015-06-08T00:13:43+5:30
महत्त्वाकांक्षी शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविणाऱ्या विविध विभागात समन्वयाच्या अभावाने आतापर्यंत ..

शतकोटीचा हिशेब जुळेना
खर्चाच्या माहितीस टाळाटाळ : योजना राबविणाऱ्या विभागात समन्वयाचा अभाव
यवतमाळ : महत्त्वाकांक्षी शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविणाऱ्या विविध विभागात समन्वयाच्या अभावाने आतापर्यंत नेमका किती खर्च झाला आणि लागवड कुठे झाली याचा ताळमेळच जुळत नाही. कोट्यवधी रुपये खर्च झाले असले तरी झाडे किती जिवंत आहे हा संबंधित विभागासाठीसुद्धा संशोधनाचा विषय आहे.
शासनाने २०११-१२ मध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजना जाहीर केली. त्यासाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. ही योजना कृषी विभाग, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, वन विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर विभागाच्यावतीने राबविली जाते. प्रत्येक विभागाला दरवर्षी स्वतंत्र उद्दिष्ट दिले जाते. या विभागात योजना राबविण्यासाठी समन्वय दिसत नाही. दरवर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. प्रत्यक्षात वृक्ष लागवड होतच नसल्याचे दिसून येते. या योजनेवर काम करणाऱ्या यंत्रणेतील गोंधळामुळे बरेचदा एकाच ठिकाणी लावलेल्या वृक्षावर पाचही विभाग दावा करतात. शिवाय लाखोंचे उद्दिष्ट घेऊन लागवड केलेल्या वृक्षांपैकी किती झाडे जिवंत आहे याबाबत कोणत्याच विभागाकडून ठामपणे सांगितले जात नाही. ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिकांची निर्मिती करण्यात आली. यातील बहुतांश रोपवाटिका केवळ अनुदानापुरत्याच अस्तित्वात आल्या. आज आठ रोपवाटिका ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र तेथील स्थिती वेगळीच आहे. असे असताना पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील विविध विभागांना ३८ लाख २० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
योजनेच्या आॅडिटची अधिकाऱ्यांमध्ये धास्ती
कळंब : शतकोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेचे आॅडिट करण्याचे जाहीर केले. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. तपासणी पथकाला कुठले झाड जिवंत दाखवायचे याची चिंता या अधिकाऱ्यांना लागली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड झालेल्या ठिकाणी २० टक्केही झाडे जिवंत दिसत नाही. या योजनेचे प्रामाणिकपणे आॅडिट झाल्यास बहुतांश अधिकारी यात दोषी आढळतील.
खड्डा तोच, रोपटे नवे
जिल्ह्यात २०११ पासून शतकोटी योजना राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र दरवर्षी त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते. निकषाप्रमाणे एक महिन्यापूर्वी अडीच फुटाचा खड्डा खोदणे त्यात विटांचा चुरा, शेणखत, काळी माती असा दीड फूट भराव दिल्यानंतर किमान दीड ते दोन फूट उंचीचे रोपटे लावणे अपेक्षित आहे.