जनगणना याद्या सदोष

By Admin | Updated: March 24, 2015 23:57 IST2015-03-24T23:57:00+5:302015-03-24T23:57:00+5:30

आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षणातील गोंधळ प्रसिद्ध झालेल्या याद्यांवरून पुढे येत आहे. याद्यांमधील चुकांवरून सर्वेक्षण किती गांभिर्याने केले असावे ...

Census Lists Defective | जनगणना याद्या सदोष

जनगणना याद्या सदोष

नेर : आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षणातील गोंधळ प्रसिद्ध झालेल्या याद्यांवरून पुढे येत आहे. याद्यांमधील चुकांवरून सर्वेक्षण किती गांभिर्याने केले असावे याचा पुरावा मिळतो. गृहिणींना मोलकरिण तर विद्यार्थ्यांना पेन्शनधारक दाखविण्याची किमयाही या सर्वेक्षणात करण्यात आली आहे.
सन २०११ मध्ये प्रत्येक कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वे करण्यात आला. याच्या प्रारूप याद्या नगरपरिषद, ग्रामपंचायतस्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक तर शहरी भागात शिक्षक, नगरपरिषद कर्मचारी आणि एका
कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले. विविध सात भागात कुटुंबाची माहिती गोळा करण्यात आली. हा
तपशील शासनाकडे पाठविण्यात आला.
या याद्या निरिक्षणासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात आल्या आहे. प्रसिद्ध झालेल्या नगरपरिषद क्षेत्रातील याद्यांमध्ये अनेक कुटुंबाची नावे गहाळ आहेत. काही कुटुंबांची माहिती चुकीची दर्शविण्यात आली आहे. अनेक कुटुंबाच्या मातीच्या घराला काँक्रीटचा सांकेतांक दिला आहे, तर सोयीसुविधांच्या तपशीलात पंखे नसणाऱ्यांकडे वातानुकुलीत यंत्र दाखविण्यात आले आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या उत्पन्न व उपजिविकेच्या स्रोतांमध्ये तर घरगुती काम करणाऱ्या महिलांना मोलकरणीचा सांकेतांक दिला आहे. विद्यार्थ्यांना काम न करता उत्पन्न मिळविणारा म्हणजे पेन्शनधारक, सावकारी व्याजाच्या आधारे उपजीविका करणारा व्यक्ती दाखविला आहे.
या संपूर्ण चुका नेर नबाबपूर नगरपरिषद अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात अधिक प्रमाणात आहे. तालुक्यातील सावरगाव (काळे), माणिकवाडा, चिकणी (डोमगा), उदापूर, ब्राह्मणवाडा (पश्चिम) येथेही बराच गोंधळ आहे. या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. ग्रामीण भागातील अनेकांना सांकेतांक हा प्रकार लक्षात येत नाही. त्यामुळे याद्या पुन्हा तयार कराव्या अशी मागणी आहे.
(तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागातही याद्यांमध्ये घोळ

संबंधित कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने सर्वेक्षण केले नसल्याच्या बाबी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार याद्यांवरून स्पष्ट होत आहे. या यादीवर आक्षेप मागविले असले तरी सांकेतांकामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. नागरिकांना या विषयाची जाण नाही. त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने लोकांना याबाबीपासून वंचित राहावे लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून याद्यांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु याविषयातही योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांपुढे ही मोठी समस्या आहे. याबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Census Lists Defective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.