काँग्रेसचे निवड मंडळ ठरविणार उमेदवार
By Admin | Updated: October 2, 2015 07:07 IST2015-10-02T07:07:25+5:302015-10-02T07:07:25+5:30
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेश काँग्रेसने निवड मंडळ

काँग्रेसचे निवड मंडळ ठरविणार उमेदवार
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेश काँग्रेसने निवड मंडळ गठित केले आहे.
झरी, मारेगाव, राळेगाव, बाभूळगाव, कळंब व महागाव या सहा नगरपंचायतींची नोव्हेंबरमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. काँग्रेसने आपले निरीक्षकही जाहीर केले. शिवाय काँग्रेसने नगरपंचायतीच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवड मंडळ बनविले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष राहणार आहे. जिल्हा प्रभारी व सहप्रभारी, त्या-त्या विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार, नगर परिषदेतील काँग्रेसचे गटनेते हे या निवड मंडळाचे सदस्य राहतील.
तर नगरपरिषद क्षेत्रातील ब्लॉक अध्यक्ष, संबंधित विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, सेवादल महिला, एनएसयुआय, इंटक, अल्पसंख्यक विभाग व अनुसूचित जाती विभागाचे संबंधित ब्लॉक अध्यक्ष यांना या निवड मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी हे निवड मंडळ निश्चित केले. काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही नगरपंचायत निवडणुकीसाठी आपले निरीक्षक जाहीर केले आहे. पाच ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असून झरी येथे युती होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. राळेगाव नगरपंचायतीची जबाबदारी सुरेश चिंचोळकर, कळंब मुबारक तंवर, बाभूळगाव उत्तम गुल्हाने, मारेगाव जयसिंग गोहोकार, झरी राकेश नेमनवार तर मारेगाव नगरपंचायतीची जबाबदारी राष्ट्रवादीने आर.डी. राठोड यांच्याकडे सोपविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचा सावध पवित्रा
काँग्रेस पक्षाने नगरपंचायतीसारख्या छोट्या संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे माजी मंत्री, माजी आमदार व प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतील नेत्यांकडे दिली. ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेत सहा नगरपंचायतीच्या निरीक्षक पदाची जबाबदारी आपल्या तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे सोपविण्याची खबरदारी घेतली.
काँग्रेसला हवा पक्षनिधी
नगरपंचायतीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून काँग्रेस पक्षनिधी घेत आहे. सर्वसाधारण वर्गासाठी एक हजार रुपये तर महिला व मागासवर्गीयांसाठी ५०० रुपये अशी रक्कम पक्षनिधी म्हणून निश्चित करण्यात आली आहे. विशेष असे, नगरपंचायतीच्या उमेदवारीचा निर्णयही प्रदेश काँग्रेसकडूनच घेतला जाईल.