फरदड मुक्तीसाठी राज्यातील २८ हजार गावांमध्ये अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:42 IST2018-12-11T13:36:42+5:302018-12-11T13:42:14+5:30
ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे.

फरदड मुक्तीसाठी राज्यातील २८ हजार गावांमध्ये अभियान
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेतल्यास उपद्रव वाढणार आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे.
बोंडअळी नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेऊ नये, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाने अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचविण्यासाठी गावांमध्ये जागृती अभियान राबविले जाणार आहे. २८ हजार गावात ही मोहीम राबविली जाणार आहे. फरदड न घेता पिकाचे अवशेष नष्ट करण्याच्या सूचना आहे. या सूचना डॉ. प्रमोद यादगिरवार, सहाय्यक संशोधन संचालक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी दिल्या आहेत.
ढगाळ वातावरणामुळे अळीला पोषक स्थिती आहे. राज्यभरात गुलाबी बोंडअळी आल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठाने फरदडीचे पीक न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी आयुक्तालयाने याबाबत खरबरदारीचे आदेश दिले आहे. शेतकरी या आदेशाची अंमलबजावणी कशी करतात, यावरच कीडीचा बंदोबस्त अवलंबून राहणार आहे.
सहा लाख हेक्टरचे आव्हान
यावर्षी कापसाला चांगला दर आहे. यामुळे पाण्याची व्यवस्था असणारे शेतकरी फरदड पीक घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे फरदडीचे पीक घेतल्या जाण्याचा अंदाज आहे.