चकरा मारायला लावणारी बँक आली ताळ्यावर
By Admin | Updated: June 29, 2016 02:36 IST2016-06-29T02:36:14+5:302016-06-29T02:36:14+5:30
पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांसाठी टाळाटाळ करणारी येथील सेंट्रल बँक शिवसेनेच्या आंदोलनानंतर ताळ्यावर आली.

चकरा मारायला लावणारी बँक आली ताळ्यावर
वर्तनात बदल : एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर आता कर्ज मंजूर
आर्णी : पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांसाठी टाळाटाळ करणारी येथील सेंट्रल बँक शिवसेनेच्या आंदोलनानंतर ताळ्यावर आली. पूर्वी कर्जासाठी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञा लेख मागून साडेचारशे रुपये खर्च करायला लावणारी बँक आता केवळ एक रुपयाच्या रेव्ह्यीन्यू तिकिटावर कर्ज मंजूर करीत आहे.
आर्णी येथील सेंट्रल बँकेत कर्ज प्रकरणासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात होता. शेतकऱ्यांना वारंवार येरझारा माराव्या लागत होत्या. बँकेत कुणी व्यवस्थित बोलायलाही तयार नव्हते. कृषी कर्ज प्रकरणात प्रत्येक फाईलसाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख मागितला जात होता. त्यासाठी शेतकऱ्यांना ४५० रुपयांचा खर्च करावा लागत होता. या बाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रारी केल्या. परंतु उपयोग झाला नाही. नंतर हे शेतकरी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व तालुका प्रमुख रवी राठोड यांच्याकडे गेले. शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल तातडीने घेतली आणि साथही दिली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत लगेच सेंट्रल बँक गाठली. कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, शेतकऱ्यांना त्रास दिला जातो, हे पाहल्यानंतर या लोकांनी बँकेतील बिझनेस करस्पॉन्डन्टला मारहाण केली. त्या दिवसापासून बँकेतील सिस्टीमच बदलली. आता शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख न मागता कर्ज प्रकरण त्वरित मार्गी लावल्या जात आहे. एक-एक रुपयाची रेव्ह्यीन्यू तिकीट घेऊन एक लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जात आहे. बँकेत अधिकारी-कर्मचारीसुद्धा आता व्यवस्थित बोलता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रामदास येरावार या आर्णीतील शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. मला सेंट्रल बँकेने कर्ज प्रकरणासाठी स्टॅम्पपेपर व त्यावर प्रतिज्ञा लेख आणा, असे सांगितले होते. त्यापोटी मी ४५० रुपयांचा खर्चही केला. परंतु मला कर्जासाठी चकरा माराव्या लागल्या. मारहाणीचे प्रकरण झाल्यानंतर केवळ एक रुपयाच्या रेव्ह्यीन्यू तिकिटावर कर्ज दिले. स्टॅम्प पेपरसुद्धा घेतले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया रामदास येरावार यांनी व्यक्त केली.
(शहर प्रतिनिधी)