पोलिसांच्या सदोष तपासाचा बोजा विमा कंपन्यांवर
By Admin | Updated: February 3, 2016 02:38 IST2016-02-03T02:38:54+5:302016-02-03T02:38:54+5:30
अपघात विमा दावा मिळविण्यासाठी बोगस प्रकरणे उभी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांच्या सदोष तपासाचा बोजा विमा कंपन्यांवर
अपघात विमा : वाहन बोगस, साक्षीदारही बनावट, दोन महिन्यानंतर अपघात पाहणारा अचानक उभा होतो कसा ?
राजेश निस्ताने यवतमाळ
अपघात विमा दावा मिळविण्यासाठी बोगस प्रकरणे उभी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एकच चालक वेगवेगळ्या दिशांच्या अनेक अपघातात आरोपी बनविला गेल्याचेही पुढे आले आहे. या माध्यमातून विमा कंपन्यांची लूट सुरु असून पोलिसांच्या सदोष तपासाचा हा बोजा मानला जात आहे.
प्रत्येकच मार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात होतात. त्यात कुणाचा मृत्यू होतो तर कोणी जखमी होतात. मयताचे वारस आणि जखमी स्वत: अपघात विमा दाव्यासाठी पात्र ठरतात. परंतु अलिकडे अपात्र असलेल्या प्रकरणांमध्येही पोलिसांच्या संगनमताने पात्र ठरविण्याचे व विमा कंपन्यांकडून दाव्यापोटी लाखो रुपयांच्या रकमा वसूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. एखादा अपघात मध्यरात्रीनंतर जंगलात निर्मनुष्य ठिकाणी घडतो. त्यात कुणाचा मृत्यू होतो, त्याला नेमकी कोणत्या वाहनाने धडक दिली हे कुणीही पाहिलेले नसते. पर्यायाने पोलीस दप्तरी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची नोंद होते. परंतु काही दिवसानंतर याच प्रकरणात कोणते तरी वाहन उभे केले जाते, त्या वाहनाने धडक दिल्याचे सांगण्यासाठी साक्षीदारही आणला जातो. सोईचे वाहन व त्यावर सोईचाच चालक दाखवून पोलिसांच्या साथीने अपघात विमा दावा दाखल केला जातो. त्यात कायद्याच्या अभ्यासकांचेही तेवढेच मोठे ‘मार्गदर्शन’ असते. कमिशन पॅटर्नवर बाहेर हा खेळ चालतो.
पोलीस प्रमुखांना
केले सतर्क
यवतमाळात अपघात विम्यातील ‘अपघात अनेक चालक एकच’ असे प्रकार पुढे आल्यानंतर जागरुक वकिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, विमा कंपन्यांच्या उच्चपदस्थ व्यवस्थापकांकडे तक्रारी करून त्यांना सतर्क केले.
अपघात विम्यात
अमर्याद दावा
अपघात विम्याच्या दाव्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल चालते. रेल्वे, विमान अपघातात मर्यादित लायबेलिटी आहे. मात्र मोटर वाहन कायद्यात अमर्याद रकमेचा दावा दाखल केला जाऊ शकतो. तेथेही मर्यादा आणल्यास गैरप्रकार थांबविणे सहज शक्य होईल. अशा प्रकरणात लाभार्थी कायद्यातील (बेनिफिशीयल लेजीस्लेशन) लवचिक तरतुदींचा गैरफायदा उठविला जात आहे. नुकसानभरपाई दिलीच पाहिजे असा या कायद्याचा अर्थ काढला जात असल्याने न्यायालय-अपघात विमा प्राधिकरणसुद्धा कधीच खोलात जात नाही. पोलिसांनी सादर केलेले दोषारोपपत्रच पुरेसे मानून अपघात विम्याचा लाभ दिला जातो.
मृत्यूला कारणीभूत, तरीही केवळ दंडावर सुटका
यवतमाळ जिल्ह्यात अशी डझनावर बोगस प्रकरणे उघडकीस आली आहे. एकच चालक वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या वाहनांवर आणि वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये दाखविला गेला आहे. त्याची काही उदाहरणे पुरावा म्हणून ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहेत. २५ ते ५० हजार रुपये घेऊन अनेक चालक अपघाताचा गुन्हा आपल्या नावावर लावून घेण्यास सहज तयार होतात. पुढे तो न्यायालयात गुन्हा कबूल करतो. त्याला एक हजार रुपये दंड ठोठावला जातो व त्याची निर्दोष सुटका होते. एकाच चालकाने अपघातात अनेकांचे बळी घेऊनही तो केवळ एक हजाराच्या दंडाच्या रकमेवर सहज सुटतो. त्याचवेळी इतर प्रकरणात कुणाचा बळी गेल्यास खुनाचा गुन्हा लावून जन्मठेप, फाशीपर्यंतची शिक्षा दिली जाते. मात्र अपघातातील बळी माफ आहेत की काय अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.