भाजपा नेत्यांना दलालांचा विळखा
By Admin | Updated: August 15, 2015 02:24 IST2015-08-15T02:24:25+5:302015-08-15T02:24:25+5:30
कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून नेत्यांना निवडून आणले, परंतु तेच निष्ठावंत कार्यकर्ते आता दूर सारले गेले असून या नेत्यांभोवती दलालांचा विळखा पडला आहे.

भाजपा नेत्यांना दलालांचा विळखा
कार्यकर्त्यांनी मांडले वास्तव : महासंपर्क अभियान राबवायचे कसे ?
यवतमाळ : कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून नेत्यांना निवडून आणले, परंतु तेच निष्ठावंत कार्यकर्ते आता दूर सारले गेले असून या नेत्यांभोवती दलालांचा विळखा पडला आहे. हे वास्तव पक्षश्रेष्ठींपुढे उघड करताना आम्ही महासंपर्क अभियान राबवायचे कसे असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रामदास अंबडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम गुरुवारी येथील महेश भवनात भाजपाच्यावतीने पार पडला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राजकीय वास्तव नेत्यांपुढे मांडले. या कार्यक्रमाला भाजपाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. उमरखेड व आर्णीचे आमदार पंचायतराज समितीच्या दौऱ्यावर असल्याने अनुपस्थित होते. महासंपर्क अभियान घरोघरी पोहचवा, केंद्र, पक्षाची ध्येय धोरणे, राज्य शासनाच्या योजना सामान्य नागरिकांना पटवून द्या, असे आवाहन नेत्यांनी केले. मात्र नेत्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी कार्यकर्त्यांनी त्यांनाच प्रतिप्रश्न केले. उमरखेड तालुक्यातील एका जबाबदार भाजपा पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांची बाजू नेत्यांपुढे आक्रमकपणे मांडली. ते म्हणाले, आम्ही शेतकरी आहो, निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या कोलमडला आहे. गेली १५ वर्ष राज्यात सत्ता नव्हती. आता केंद्रात व राज्यात सत्ता आली आहे. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन व जनतेला महत्व पटवून देऊन भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणले. आता या परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी या नेत्यांवर आहे. निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणाऱ्या या नेत्यांनी आता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच दूर सारले आहे. त्याऐवजी आता या नेत्यांभोवती कायम दलालांचा वेढा पडलेला असतो.
‘मार्जीन मनी’मुळे हे कमर्शियल दलालच या नेत्यांना जवळचे वाटू लागले आहे. या दलालांना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा दर्जा दिला जाऊ लागला असून तेच सामान्य कार्यकर्त्यांना आदेश देऊ लागले आहे. अशा स्थितीत महासंपर्क अभियान राबवायचे कसे असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यावर तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. (जिल्हा प्रतिनिधी)
मंडळांवरील छुप्या नियुत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता येऊन वर्ष लोटते आहे. मात्र अद्यापही मंडळ-महामंडळ, जिल्हा व तालुका स्तरावरील समित्या व अन्य प्रतिष्ठेच्या, लाभाच्या पदावरील नियुक्त्या झालेल्या नाहीत. छुप्या मार्गाने काही नियुक्त्या केल्या जात आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत. या सन्मानाच्या पदासाठी कार्यकर्त्यांना आणखी किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार, असा जाब नेत्यांना विचारण्यात आला. त्यावर कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही ओळखल्या आहेत, त्या सरकार व पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवून लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन नेत्यांनी वेळ मारुन नेली.