खड्डेच करतात गतिरोधकाचे काम
By Admin | Updated: June 15, 2014 23:49 IST2014-06-15T23:49:14+5:302014-06-15T23:49:14+5:30
उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आता गतिरोधकाचे काम करीत आहे. या खड्ड्यांमुळे वाहने हळू जात असल्याने अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र नागरिकांना या खड्ड्यांचा नाहक

खड्डेच करतात गतिरोधकाचे काम
विडूळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आता गतिरोधकाचे काम करीत आहे. या खड्ड्यांमुळे वाहने हळू जात असल्याने अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र नागरिकांना या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
उमरखेड येथील बस स्थानकासमोर कित्येक दिवसांपासून गतिरोधकाची मागणी आहे. परंतु ती मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. मात्र गतिरोधकाचे काम आता रस्त्यावर पडलेले खड्डे करीत आहे. बस थांब्याजवळ मोठमोठ्ठाले खड्डे पडले आहे. या मार्गावरून ढाणकी, बिटरगाव, किनवट, देवसरी, हिमायतनगर आदी गावांना वाहने जातात. त्यामुळे मार्गावर मोठी वर्दळ असते. तसेच आॅटोरिक्षा, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी अहोरात्र सुरू असतात. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर खड्डे पडले. संपूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली. रस्त्याची डागडुजी मात्र बांधकाम विभागाने केली नाही. त्यामुळे खड्डे तसेच आहे.
या खड्ड्यामुळे वाहन हळू चालवावे लागतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. आता नागरिक उपहासाने हे खड्डे राहू द्या, अपघात तर होत नाही ना असे म्हणत आहे. मात्र या खड्ड्यांमुळे वाहनांना मोठे नुकसान होत आहे. अनेक वाहने खड्डे आदळून नादुरुस्त होत आहे. तसेच चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. संबंधित विभागाने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा आणि गतिरोधक तयार करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)